
Pune News : कापसाला यंदा ७ हजार १२१ रुपये हमीभाव आहे. तर बाजारात सध्या कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे. कापसाला ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सीसीयला कापूस देत नाहीत. सीसीआयची खरेदी कमी झाली, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंभी देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रस्तावांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी शेतीमाल बाजारभाव आणि सरकारी खरेदी याचीही माहिती दिली. सोयाबीन, कापूस, मूग, तूर या शेतीमालाच्या बाजारभावाची त्यांनी माहिती सभागृहात दिली. परंतु त्यांनी कापसाचा हमीभाव आणि कापसाला सध्या बाजारात मिळत असलेल्या भावावरून शेतकरीच नव्हे तर राज्याची दिशाभूल केली अशी टिका शेतकरी करत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार १२१ रुपये हमीभाव आहे. तर बाजारात सध्या ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा खुल्या बाजारात कापसाचे भाव जास्त असल्याने शेतकरी खुल्या बाजारातच कापसाची विक्री करत आहेत. सीसीआयला हमीभावाने शेतकरी कापूस देत नाहीत. त्यामुळे सीसीआयची खरेदीही कमी झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.
प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूलच केली आहे. एकतर त्यांनी कापसाच्या हमीभावावरून अपूर्ण माहिती दिली. कारण कापसाला केवळ ७ हजार १२१ रुपयेच हमीभाव नाही. हा हमीभाव मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा आहे. लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव ७ हजार ५२१ रुपये आहे. पण मुख्यमंत्र्यांनी लांब धाग्याच्या कापसाच्या हमीभावाची माहीती दिली नाही. त्यांनी फक्त लांब धाग्याच्या कापसाचीच माहिती दिली.
राज्यातील कापूस उत्पादनाचा विचार केला तर जास्तीत जास्त उत्पादन हे लांब धाग्याच्या कापसाचेच होते. ज्याचा हमीभाव ७ हजार ५२१ रुपये आहे. याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला नाही. त्यांनी आपल्या सोईप्रमाणे केवळ मध्यम लांब धाग्याच्या कापसाच्या हमीभावाच उल्लेख केला. म्हणजेच बाजारात सध्या हमीभावापेक्षा जास्त भाव मिळतो हा दावाच चुकीचा आहे.
दुसरे म्हणजे त्यांनी जो सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपये भाव सांगितला हा सरासरी भाव बाजारात मिळत नाही. आज राज्यातील कुठल्याच बाजार समितीमध्ये या दरम्यान सरासरी भाव मिळाला नाही, हे राज्य सरकारच्या पणन विभागाच्याच माहितीवरून स्पष्ट होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर रोजच्या बाजारभावाची माहिती मिळत असते. या संकेतस्थळावर कुठल्याच बाजारात सरासरी भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला नाही. मागील आठवडाभरात क्वचितच एखाद्या बाजारात यादरम्यान भाव होता. म्हणून सर्वच बाजारांमध्ये हा भाव मिळतो, असा दावा कदाचित मुख्यमंत्री करत असावेत.
सीसीआयच्या अपयशाचं खापर शेतकऱ्यांवर
मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितले की शेतकरी सीसीआयला कापूस देत नाहीत. ही देखील दिशाभूलच आहे. कारण खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने शेतकरी सीसीआयला कापूस देण्याच प्रयत्न करत आहेत. पण सीसीआयच्या केंद्रांवर नियम आणि अटींची मोजपट्टी लावून हमीभावापेक्षाही कमी भाव दिला आहे. खुल्या बाजारात जसे गुणवत्ता थोडी जरी कमी असली तरी भाव कमी केले जातात.
तसे सीसीआय करत आहे. तसेच खरेदी केंद्रे कमी असल्यामुळे खरेदीची गती धिमी आहे. कापसाची खरेदी ऑक्टोबरच्या मध्यात सुरु झाली. म्हणजेच दोन महीने होऊन गेले. या दोन महिन्यांमध्ये राज्यात आतापर्यंत केवळ साडेपाच लाख गाठी कापूस खरेदी झाला. खरेदीसाठी लवकर नंबर लागत नाही. किचकट अटी आणि निकष यामुळे शेतकऱ्यांना इच्छा असूनही सीसीआयला कापूस देता येत नाही. त्यामुळे सीसीआयच्या केंद्रांवर पूर्ण हमीभाव एक दोन लाॅटलाच मिळत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सीसीआयला कापूस देत नाहीत, हा जो दावा केला तो देखील चुकीचा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.