Sindhudurg News : काजू बीला २०० रुपये हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथन अहवालप्रमाणे कार्यवाही व्हावी यांसह विविध मागण्यांसाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार मंगळवारी (ता.७) झालेल्या बैठकीत काजू बागायतदारांनी केला. हमीभावासाठी आंदोलनाचा निर्णय देखील घेण्यात आला.
वैभववाडी तालुक्यातील सिंधूवैभव ॲग्रो शेतकरी कंपनीच्या कार्यालयात तालुक्यातील काजू बागायतदारांची बैठक झाली. या बैठकीला फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगबंर पाटील, महेश संसारे, मंगेश कदम, महेश गोखले, महेश रावराणे, तालुका समन्वयक राजू पवार आदी उपस्थित होते.
श्री. सावंत यांनी आता काजू बागायतदारांनी एकवटून आरपारच्या लढाईकरिता सज्ज होण्याची गरज आहे. स्वामीनाथन अहवाल शासनाने स्वीकारला तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे हा अहवाल शासनाने स्वीकारला पाहिजे. काजू बीला २०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. तसेच, प्रतिकिलो १२९ रुपये खर्च येतो असा दापोली विद्यापीठाचा अहवाल आहे.
मात्र शेतकऱ्याला प्रत्यक्षात १२० रुपये दर मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटितपणे काजू बी हमीभावासाठी आंदोलन केले पाहिजे. गोव्यात जे शक्य आहे, ते महाराष्ट्रात देखील शक्य होऊ शकेल. परंतु त्याकरिता आपण एकत्रितपणे लढा उभारण्याची आवश्यकता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू बागायतदार १६ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजेत. तर आपल्याला न्याय मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी त्यांनी तालुक्यातील काजू उत्पादकांशी चर्चा केली. तालुक्यातील उत्पादकांनी या लढ्यात सर्व ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला.
आयात शुल्क १३ टक्के करावा
आयात शुल्क अडीच टक्क्यांवरून १३ टक्के करावा. जीआय मानांकन जिल्ह्यातील काजूगरातील भेसळ रोखावी. याशिवाय अन्य मागण्यांबाबत बागायतदारांनी चर्चा केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.