
Crop Damage : "राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल. अजून नुकसानीचे पूर्ण आकडेवारी मिळाली नाही. नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Panchnama) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राज्यात १३ हजार ७२९ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतर तात्काळ मदत जाहीर करू," अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सभागृहात दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी माहिती दिली.
"शेतकऱ्यांच्या संपूर्ण नुकसानीची माहिती घेऊ आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करू," असे आश्वासनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राज्यात दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
राज्याच्या बहुतांश भागात गारपीट, वादळी वारे आणि पावसाने शेतकऱ्यांने मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, द्राक्ष, कांदा, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकाला फटका बसला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशा घोषणा विधानभवनाच्या पायऱ्यावर देत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, चेतन तुपे आणि मनीषा कायंदे आदि उपस्थित होते.
राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी आंदोलन केले. कामकाजाला सुरुवात होताच, अजित पवार, नाना पटोले आणि छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने काय निर्णय घेतला, असा प्रश्न उपस्थित केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.