
Sangli News : ‘‘येथे विजापूर- गुहागर मार्गावर होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी मोठा चौक निर्माण करावा. नव्याने निर्माण होत असलेल्या शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना एकरी दोन कोटी याप्रमाणे भरपाई द्यावी,’’ अशी मागणी सरपंच अमर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, दिलीप शिंदे, कुलदीप शिंदेसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्ग हा घाटनांद्रे परिसरातून जात असताना शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बागायत क्षेत्रातून जात आहे.
या परिसरात अन्य कोणतेही उद्योगधंदे नसल्याने महामार्ग बाधित लोकांचा उदरनिर्वाह शंभर टक्के शेतीवरच आधारित आहे. शेतीच गेली तर पुढे संबंधित बळिराजावर कंगाल होण्याची वेळ येणार आहे. तेव्हा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकरी दोन कोटी रुपयांप्रमाणे मोबदला मिळालाच पाहिजे, ही मागणी आहे.
शिवाय, हा मार्ग ज्या ठिकाणी विजापूर-गुहागर मार्गावर क्रॉस होणार आहे, तिथे एक मोठा चौक निर्माण व्हावे, जेणेकरून त्याचा लाभ नजीकच असणाऱ्या श्री क्षेत्र खरसुंडी, श्री क्षेत्र शुकाचारी, श्री क्षेत्र रेवणसिद्ध, श्री क्षेत्र हर्णेश्वर, श्री क्षेत्र परमेश्वर, श्री क्षेत्र बिरोबा (आरेवाडी) व किल्ले बाणूरगड या क्षेत्रांना भेटी देणाऱ्यांना होणार आहे.
हा महामार्ग शक्तिपीठांना जोडणारा असल्याने हे सार्थ ठरणार आहे. शिवाय, घाटनांद्रे सांगली, सोलापूर या दोन जिल्ह्याच्या व कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर व सांगोला या चार तालुक्याच्या सीमेवरील ठिकाण असल्याने येथे सर्कल निर्माण होणे गरजेचे आहे. तसे केल्यास त्याचा खूप मोठा लाभ जनतेला होणार आहे. तेव्हा आमच्या या दोन मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.