
New Delhi News : पिकांच्या किमान आधारभूत मूल्यास कायद्याचा आधार देणे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरिता देशातील २०० शेतकरी संघटनांचा मोर्चा आज (ता.१३) राजधानी नवी दिल्लीकडे कूच करणार आहे. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर ट्रॉली सज्ज ठेवल्या आहेत.
दुसरीकडे केंद्र व संबंधित राज्य सरकारांनी आंदोलकांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी अडथळे आणि पोलिस, ‘सीआरपीएफ’द्वारे कडक बंदोबस्त लावला आहे. तर राजधानीच्या सीमेवर प्रचंड नाकाबंदी करण्यात आली आहे.
संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या आंदोलनाचे नेतृत्व करत असून पाच प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या केंद्र सरकारपुढे ठेवणार आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार सुमारे २५ हजार शेतकरी आणि ५००० ट्रॅक्टर्स मंगळवारी (ता.१३) दिल्लीकडे पंजाब आणि हरियानातील विविध जिल्ह्यांमधून रवाना होणार आहेत.
सरकारतर्फे रस्त्यांवर करण्यात आलेल्या अडथळ्यांना पार करण्याकरिता शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ‘मॉडिफाईड’ केले आहेत. तर सरकारकडून ठिकठिकाणी बॅरिकेड, सिमेंट ब्लॉक्स, मोठे कंटेनर वाळू, खड्डे खणून रस्ता अडविण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणाकरिता रस्त्यांवर लोखंडी खिळे, वॉटर कॅननचा वापर केला जाणार आहे. याशिवाय हरियानात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सात जिल्ह्यांतील इंटरनेट, बल्क एसएमएस, डोंगल सेवा बंद केल्या आहेत.
शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी हरियानातील अंबाला, जिंद, फतेहबाद आणि कुरुक्षेत्र आदी पंजाबलगतच्या जिल्ह्यांत काँक्रिट ब्लॉक्स, लोखंडी खिळे आणि काटेरी तारा वापरून सीमेवर अडथळे उभे केले आहेत. हरियाना सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यांत जमावबंदीचे १४४ कलमही लागू केले आहे.
ट्रक्टर ट्रॉलीसह मोर्चा काढण्यास बंदी घातली आहे. किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सारवानसिंह पंधेर यांनी सांगितले, की पंजाबमधील फतेहगड साहीब जिल्ह्यात एकत्र जमण्यासाठी अमृतसरमधील बियासमधून ट्रॅक्टर ट्रॉलींचा ताफा निघाला आहे. मोगा, भटिंडा आणि जालंधर जिल्ह्यांतील शेतकरीही मोर्चात सहभागी होऊ लागले आहेत.
दिल्ली-शंभू सीमा तसेच खानौरी-जिंद आणि डबवाली सीमेवरून दिल्लीच्या दिशेने जाण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे. दरम्यान, कर्नाटक, मध्य प्रदेशातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मध्य प्रदेशात रोखण्यात आले आहे. त्यांना सोडविण्याची मागणी किसान मोर्चाने ज्येष्ठ नेते जगजितसिंग धालेवाल यांनी केली आहे.
दिल्लीत संचारबंदी लागू
शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली शहरांत पुढील तीस दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्तांनी कलम १४४ अंतर्गत नोटीस काढली आहे. दिल्ली आणि नवी दिल्ली कार्यक्षेत्रात कोणत्याही स्वरुपातील मोर्चा काढण्यास, रस्ते अडविण्यास, आंदोलकांकडून ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक आणण्यास संघटनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच समाज माध्यमांवरील मजकूरही तपासला जाणार आहे. याशिवाय दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे.
मोर्चा रोखण्याची तयारी
पंजाब-हरियाना सीमेवर मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स उभारले
सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा खंडित
मोर्चाचा मार्ग तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे पोलिसांचे आवाहन
कर्नाटकवरून ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले ७० शेतकरी भोपाळमध्ये ताब्यात
इतर राज्यांतून मोर्चासाठी येणाऱ्या व ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडून देण्याचे शेतकरी नेत्यांचे आवाहन
काय आहेत मागण्या?
किमान हमीभावाची कायदेशीर ‘गॅरंटी’ द्यावी
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात
शेतकरी, शेतमजुरांना निवृत्तिवेतन द्यावे
शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
तीन केंद्रीय मंत्री करणार चर्चा
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलकांशी मागण्यांसंदर्भात चर्चेची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अर्जुन मुंडा, नित्यानंद राय हे चंडीगड येथे शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यापूर्वी या तिघांबरोबर नुकतीच ८ फेब्रुवारीस चर्चेची पहिली फेरी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.