Satara News : यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनला एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा पडत असल्याने उत्पन्न तर लांबच; पण मळणीचा खर्चही निघेना, अशी अवस्था जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.
दसरा-दिवाळीचा सण जवळ आला असून, खरिपातील हुकमी पैसे देणाऱ्या सोयाबीनच्या पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र या हंगामात एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीनचा उतारा येत आहे. हंगामाची सुरुवातच अडचणीने झाली आहे. जूनमध्ये पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली. यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.
त्यामुळे फुलोरावस्थेत पावसाचा खंड राहिल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला. पावसाचा अभाव, रोगराई यामुळे उत्पादनात घट होऊन एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल उतारा मिळत आहे. परिणामी, मशागत, बी-बियाणे, कीटकनाशके, मजूर, काढणी, मळणी या उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चापेक्षाही कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडत आहे.
यामुळे सोयाबीनपासून नफा तर सोडा, उलट तोटाच पदरात पडत आहे. कमी उत्पादन निघाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. मजुरांकडून सोयबीन काढणीस साडेचार हजार व मळणी प्रति पोते ४०० रुपये मशिन यंत्र मालकाकडून घेतले जात आहेत.
सोयाबीनला साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक रहात नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.