
Buldana News : खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने १५०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. आपण केलेल्या जलसमाधी आंदोलनात ही प्रमुख मागणी होती. या मागणीचा राज्य शासनाने विचार करून मदत दिली असून हे आंदोलनाचे फलित आहे, असे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सततच्या पावसाने गेल्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. पावसाने झालेल्या नुकसानाचीही नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी सर्वप्रथम आपण लावून धरली. बुलडाण्यातील एल्गार मोर्चानंतर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत जलसमाधी आंदोलन छेडले होते.
या आंदोलनावेळी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देऊ व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करू, असा शब्द दिला होता.
वेळप्रसंगी नियम आणि निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचा मानस त्या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतरही आपण कृषिमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले.
मंगळवारी (ता.१३) झालेल्या बैठकीत पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १५०० कोटी रुपयांना मान्यता मिळाली. यात बुलडाणा जिल्ह्यासाठी अंदाजे २६० कोटी रुपये मिळणार आहेत. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. हे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावेत, जेणेकरून पेरणीसाठी हे पैसे उपयोगात येतील, असेही तुपकर म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.