Cotton Cultivation : अकोला जिल्ह्यातील गणेश नानोटे यांचे कापूस लागवड नियोजन
शेतकरी : गणेश नानोटे
गाव : निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
एकूण शेती : ४५ एकर : कापूस लागवड : १४ एकर
अकोला जिल्ह्यातील निंभारा (ता. बार्शीटाकळी) येथील गणेश नानोटे यांची प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख आहे. मागील ३० वर्षांपासून ते कपाशी लागवड करत असून विविध प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो.
नानोटे यांची ४५ एकर शेती आहे. यावर्षी १४ एकरांत कापूस तर उर्वरित क्षेत्रात २५ एकरांत सोयाबीन, २ एकरांत केळी आणि हंगामी पिकांची लागवड आहे.
लागवड नियोजन
- यंदा १४ एकरांत कपाशी लागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार पूर्वमशागत करून जमीन लागवडीसाठी तयार केली.
- लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील मागील हंगामातील पीक निघाल्यानंतर पंजी मारून रोटाव्हेटर फिरवून जमिनीची मशागत केली.
- साधारणपणे ३ जूनपासून यावर्षीच्या कापूस हंगाम सुरु करण्याचे नियोजित होते. त्यानुसार आधीपासूनच संपूर्ण तयारी करून ठेवली होती.
- लागवडीचे नियोजन केलेल्या क्षेत्रामध्ये सिंचनासाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणार आहे. त्यानुसार ठिबकच्या नळ्या अंथरून घेण्याचे काम सुरु आहे. तसेच तुषार सिंचनाचे नियोजन केलेल्या १ एकर क्षेत्र ६ तास पाणी देऊन चांगले भिजवून घेतले.
- लागवडीसाठी बैलजोडीच्या साह्याने सऱ्या पाडून घेतल्या.
- जमिनीच्या मगदुराप्रमाणे पीक नियोजन म्हणजे जातीची निवड, लागवड अंतर, खत आणि सिंचन व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे.
- लागवडीसाठी खासगी कंपनीच्या बियाणांचे एकरी २ ते ३ पॅकेट (प्रति पॅकेट ४५० ग्रॅम) पुरेसे होते. बियाणांचे मजुरांद्वारे टोकण केली जाईल.
- हलक्या क्षेत्रावर ३ बाय सव्वा फूट अंतरावर तर केळीच्या पिकाची बेवड असलेल्या शेतामध्ये साडेचार बाय सव्वा फूट अंतरावर लागवडीचे नियोजन आहे.
- लागवड करताना एका जागेवर एकाच बियाणे सरीच्या वरच्या टोकावर टोकण पद्धतीने लावले जाते. यामुळे शक्यतोवर नांग्या (खड्डे) भरण्याची गरज पडत नाही. तसेच जास्त पाऊस झाला तरी बियाणे दडपले जात नाही.
मिश्रपीक पद्धतीचा अवलंब
यावर्षी कापूस लागवडीतील काही क्षेत्रामध्ये मिश्र पीक म्हणून तूर पिकाची लागवड केली जाईल. त्यानुसार दोन ओळी कापूस तर १ ओळ तूर पिकाची लागवड केली जाईल. मिश्रपीक पद्धतीमुळे जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान आणि बाजारभावातील अनिश्चितता या बाबींमुळे एक पीक गेले तरी दुसऱ्या पिकापासून उत्पादन मिळण्यास मदत होते.
आगामी नियोजन
- खत उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी डीएपी खताची एकरी १ बॅग मात्रा दिली जाईल.
- पावसाचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.
- तण दोन पानांवर असताना तणनाशकाची फवारणी घेतली जाईल.
बियाणे निवड
लागवडीसाठी मागील वर्षी चांगले उत्पादन मिळालेल्या आणि काही नवीन निवडक जातींच्या बियाणांची निवड करणार आहे.
साधारण १४० ते १५० दिवसाच्या मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करणार आहे. जेणेकरून साधारण १६५ दिवसांमध्ये पीक निघून पूर्ण शेत रिकामे होईल.
गणेश नानोटे, ९५७९१ ५४००४, (शब्दांकन : गोपाल हागे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.