Sangli News : जिल्ह्यातील अवघ्या चार गावांतील पाणी दूषित आहे. याबाबतचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. यात जत तालुक्यातील वाळेखिंडी आणि शेगाव, आटपाडीतील माडगुळे आणि तासगाव तालुक्यातील भैरववाडी या गावांचा समावेश आहे. शुद्धीकरण करून पाणी पिण्यास वापरण्याच्या सूचना संबंधित गावांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्यातील गावांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. त्यासाठी गावातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जातात.
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील १००७ ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी जत तालुक्यातील वाळेखिंडी आणि शेगाव, आटपाडीतील माडगुळे आणि तासगावमधील भैरववाडी या चारच गावांतील पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या गावांना पाणी शुद्धीकरण करूनच पिण्यास वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवत आहे. जत, आडपाडी तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही गावांत तर आठवड्यातून एकदा टँकरचे पाणी मिळते. अशा स्थितीत मार्चमधील अहवालामध्ये केवळ चारच गावांतील पाणी दूषित आढळून आले, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
विविध उपाययोजना
पाणीपुरवठा व स्वच्छता प्रकल्प विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते म्हणाले, ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळेच अशुद्ध पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कूपनलिकांतून पाणी पुरवठा होत असेल तर परिसरात स्वच्छता ठेवणे, नळपुरवठ्यातून असेल तर गळती काढणे, योग्य प्रमाणात टीसीएलचा वापर आदी उपाययोजना राबविल्या असल्याचे सायमोते यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.