
Mrig Bahar Pomegranate Crop Insurance : मृग बहर-२०२५ मध्ये डाळिंब पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा आणि अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.
डाळिंब पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. दोन वर्षे वय पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. या योजनेत सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो. एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे.) आणि उर्वरित विभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी चार हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.
डाळिंब फळपिकासाठी मृग अथवा आंबिया बहर या दोन्ही हंगामात विमा संरक्षण देय आहे. मात्र एक शेतकरी त्याच्या सर्व पिकास या पैकी ज्या हंगामात तो पीक घेतो त्या एकाच हंगामात भाग घेऊ शकतो .
विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
- विनयकुमार आवटे, ९४०४९६३८७० (कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया), कृषी आयुक्तालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.