
Palghar News : उन्हाच्या कडाक्यामुळे मे महिन्यात विहिरीच्या पाण्याने तळ गाठलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यासाठी नागरिकांनी या विहिरी साफ करून आतील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
वर्षभर जमा झालेला कचरा, घाण काढून नव्याने साचणारे पावसाचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच १० ते १५ दिवस अगोदरच स्वच्छता केली जात आहे.
विक्रमगड तालुक्यातील गावागावांत पिण्याच्या पाण्याच्या अनेक सार्वजनिक विहिरी आहेत. गावात नळपाणी योजना कार्यान्वित असली तरी एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होते. त्या वेळी या विहिरीतील पाणी हंडा-कळशीने महिला वर्ग घरी आणत असतात.
वर्षभर या विहिरीत पालापाचोळा, माती जाऊन गाळ निर्माण होतो. तसेच पाण्यात अनेक जलचर असतात. पाणी आणण्यासाठी आलेल्या महिलांची पाणी ओढण्याची काढणी (बकेट) तुटून बुडालेली असतात.
लहान मुलांकडून खेळण्याच्या नादात दगड-धोंडे टाकले जातात. जसजसे विहिरीतील पाण्याची पातळी कमी होते, तशा या सर्व वस्तू दिसू लागतात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर विहिरीतील झरे नव्याने वाहण्यास सुरवात होते. त्याआधी गावातील नागरिक विहिरी साफ करून त्यातील गाळ काढण्याचे काम करतात.
विहिरीत नव्याने होणारा पाणीसाठा शुद्ध राहावा, यासाठी एक दिवसाचे श्रमदान करतात. विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांत श्रमदानातून विहिरी साफ करण्यास व गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे; तर काही विहिरींच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडी, काट्या तोडून परिसर मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.