Mumbai News : राज्यातील बारावी, पदवी आणि पदविकेचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भत्ता देण्यासाठी ‘लाडका भाऊ’ योजनेची पोकळ घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खरी पण यामुळे राज्यात तरुणांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पात रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा करून तीच घोषणा पंढरपूरमध्ये नव्याने केल्याने राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडला आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणून राज्यातील महिलांना महायुतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर अर्थसकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली.
या अंतर्गत प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक आर्हतेनुसार म्हणजे बारावी उतीर्णला सहा हजार, आयटीआय किंवा पदविका असेल तर आठ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर पदवी असेल तर १० हजार रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेसाठी तातडीने शासन आदेश काढून मान्यताही देण्यात आली. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्य सरकार उमेदवारांना विद्यावेतन देणार आहे. यासाठी पाच हजार ५०० कोटींची तरतूद केली.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या योजनांचा प्रसार करण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी रोज नव्या पद्धतीने सांगण्यास सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पाला मान्यता मिळण्याआधीच लाडकी बहीण योजनेचा शासन आदेश काढला तर आता प्रशिक्षण योजना अर्थसकल्पातील असली ती नव्या नव्या पद्धतीने सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे.
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील १२ वी, पदवी आणि पदविका झालेल्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम खात्यात जमा करणार असल्याचे सांगत लाडका भाऊ योजना जाहीर करत असल्याचे सांगितले. त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात येणार असल्याचा संभ्रम राज्यातील तरुणांमध्ये निर्माण झाला. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे विद्यावेतन देण्यात येणार असले तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मदत एक वर्षासाठी देणार असल्याचे सांगत आणखी संभ्रम निर्माण केला.
सरकारी ‘रेवडी’
राज्यात बेरोजगारांची संख्या वेगाने वाढत आहे. पोलिस भरतीसाठी कित्येक पटींनी अर्ज येत असताना दोन दिवसांपूर्वी कलिना कॅम्पसमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीतर्फे विविध ३०० पदांसाठी तब्बल २४ हजार तरुण आले होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती होती. त्यामुळे आता अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनेला नव्याने सरसकट पद्धतीने विद्यावेतन देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्र्यांनीच गोंधळात भर घातली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घोषणांचा पाऊस पाडत सरकारी रेवडी वाटण्याचा घाऊक कार्यक्रम सुरू आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.