Pune News : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी (ता.२२) बँकांना कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, असे आवाहन केले होते. तसेच रेड्डी यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना, लोकसभा निवडणुकीनंतर कर्ज माफ केले जाईल, असे नगरकुर्नूल येथील जाहीर सभेत पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यामुळे तेलंगणात शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार हे निश्चित मानले जात आहे. यादरम्यान दहा दिवस आधी १५ तारखेला राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन आंदोलन केले होते. तसेच नाराजी व्यक्त करताना पोस्टकार्ड आंदोलन करून रेड्डी यांना धान बोनसची आठवण करून देण्यात आली होती. यावरून येथील राजकारण चांगलेच तापले होते.
रेड्डी म्हणाले की, बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या थकबाकीसाठी नोटिसा पाठवू नयेत. सरकारने शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. ते जूनमध्ये आचारसंहिता संपताच काँग्रेस सरकार पूर्ण करेल. राज्य सरकार १५ ऑगस्टपूर्वी एकाच वेळी कर्जमाफी पूर्ण करेल. शेतकऱ्यांनी पीक कर्जाची चिंता करू नका. राज्य सरकार ते कर्ज माफ करणार आहे. आम्ही आम्हाला आमच्या आश्वासनाचा विसर पडलेला नाही.
बीआरएस नेते तथा आमदार हरीश राव यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांनी खोचक सवाल केला होता. राव यांनी, १५ ऑगस्टपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात जर सरकार अयशस्वी झाले तर रेड्डी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील का? असा सवाल केला होता. यावर रेड्डी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी केली तर तुमचे काका तथा बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव आपला पक्ष विसर्जित करतील का? असा प्रतिसवाल रेड्डी यांनी राव यांना केला आहे. तसेच 'सूर्य पश्चिमेकडून उगवला तरी काँग्रेस सरकार १५ ऑगस्टपर्यंत पीक कर्ज माफ करेल' असेही रेड्डी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसला बहुमत देण्याचे आवाहन
रेड्डी यांनी अविभाजित महबूबनगर जिल्ह्यातील जनतेने जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर प्रचंड बहुमत देऊन काँग्रेसचे हात बळकट करावेत असे आवाहन केले. ते म्हणाले की, टीपीसीसी प्रमुख म्हणून काँग्रेसचे नेतृत्व करणारे आणि मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करणारे या जिल्ह्यातील ते पहिले व्यक्ती आहेत.
'बुर्गुला रामकृष्ण राव यांच्यानंतर आता पलामुरूचा नेता मुख्यमंत्री झाला आहे. रस्ते व नाल्यांच्या मंजुरीसाठी इतरांना विनवण्यापासून ते आता ११९ विधानसभा मतदार संघातील विकासकामांना मंजुरी देत आहे. यामुळे विकासाच्या या टप्प्यावर योग्य उमेदवार निश्चित करण्याची ही सुवर्णसंधी महबूबनगर जिल्ह्यातील जनतेने गमावू नये, असेही आवाहन केले आहे.
दरम्यान काही आधी पोस्टकार्ड आंदोलनाचा धाना धरून बीआरएस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसवर टीका केली होती. राव यांनी, 'तेलंगानात काँग्रेसचे काहीच दिवस उरले असून हे सरकार पडेल, असे म्हटले होते. तसेच येत्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणार नसून त्यांचे फक्त दोन आमदार येतील', अशी टीका देखील राव यांनी केली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.