Agriculture Tax : करमुक्त कृषी व्यवस्था देणारे शिवाजीराय पहिलेच राजे

Tax Free Agriculture System : देशातील पहिली कृषी क्रांती शिवरायांनीच घडवून आणली. त्यांनी पाच वर्ष करमुक्त शेती व्यवस्था तयार केली.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘मध्ययुगातील सुलतानी संकटाच्या पाशातून सोडवत समृद्धीसाठी शेतकऱ्यांना करमुक्त कृषी व्यवस्था देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आशिया खंडातील पहिले राजे होते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले.

१७६ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या पुणे नगर वाचन मंदिरात ‘लोक कल्याणकारी शिवराय आणि त्यांची राजनीती’ या विषयावरील व्याख्यानात श्री. बलकवडे बोलत होते. या वेळी त्यांनी शिवरायांचे कृषी धोरण विस्तृतपणे स्पष्ट केले.

नगर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह प्रसाद जोशी उपस्थित होते. शिवरायांचा रंजक इतिहास सांगताना श्री. बलकवडे यांनी दोन तास सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Agriculture Water Tax : दहापट दराने पाणीपट्टी आकारणी तूर्त टळली, पण आजचं मरण उद्यावर

श्री. बलकवडे म्हणाले, “देशातील पहिली कृषी क्रांती शिवरायांनीच घडवून आणली. त्यांनी पाच वर्ष करमुक्त शेती व्यवस्था तयार केली. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळाली. त्यातून गावागावांमधील अठरा पगडजाती आणि बारा बलुतेदारीला कामे मिळाली व हा वर्गदेखील सधन झाला. त्यामुळे अर्थक्रांती घडून आली व त्याचे रूपांतर पुढे सामाजिक क्रांतीत झाले. आधी सुराज्य आणि नंतर स्वराज्य उभारणी करणारे शिवाजी महाराज हे जगातील आदर्श राजे होते.”

‘‘महाराष्ट्रातील कृषी व्यवस्था परकीयांनी उद्ध्वस्त केली होती. शेतकऱ्यांमध्ये अन्नधान्य पिकवण्याचीच ताकद सोडाच; परंतु, स्वतःचे पोट भरण्याइतकीदेखील क्षमता उरलेली नव्हती. यवनांकडून ६०-६५ टक्क्यांपर्यंत सक्तीने करवसुली चालू होती. शेतकरी अर्धपोटी झोपत होते. सत्तांध व्यवस्थेने लोकांच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj
Agriculture Tax : शेतसारा ऑनलाइन भरता येणार

अशावेळी शिवरायांनी सोन्याचा नांगर चालवून सर्वप्रथम शेतकऱ्यांना आधार दिला. त्यांनी शेतकऱ्यांना बैलजोडी, शेती अवजारे, बी-बियाणे उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे पीक येईपर्यंत चार महिने पुरेल इतके धनधान्य शेतकऱ्यांना वाटले व त्यांची पोटभर जेवण्याची सोय केली. त्यांनी स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या गावांमधील सर्व पडीक जमीन लागवडीखाली आणली. शेतकऱ्यांना पाच वर्षे सारा माफ केला,’’ असेही श्री. बलकवडे यांनी नमूद केले.

‘मध्ययुगात भरायचे माणसांचे बाजार’

“मध्ययुगातील मध्यवर्ती सत्ता जनतेचे सर्व प्रकारे शोषण करीत होती. लोकांना उपाशी ठेवून कर वसूल केला जात होता. भुकेकंगाल लोकांकडे पैसा नसल्याचे पाहून त्यावेळच्या जुलमी राजवटीने थेट माणसांची विक्री करून नफा मिळविण्याची माणुसकीहिन व्यवस्था स्वीकारली होती. अशावेळी शिवरायांचा उदय हा माणुसकी आणि स्वातंत्र्याची पहाट ठरला,” असेही श्री. बलकवडे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com