
Chemical Water Panchaganga River : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि वारणा या दोन नद्या प्रमुख मानल्या जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. याचे मुख्य कारण औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त सांडपाणी आहे. हातकणंगले तालुक्यातील रूई पुलाजवळ असलेल्या नाल्यातून लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी राजरोसपणे नदीत सोडले जाते. विशेष म्हणजे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या ओढ्यात मध्यरात्री २ ते सकाळी ७ यावेळेत एखादा धबधबा कोसळावा असे काळे रसायनयुक्त सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे असे चित्र आहे. स्थानिकांनी अनेकवेळा आवाज उठवूनही कसलीच उपाययोजना झाली नसल्याने स्थानिकांनी याबाबत खंत व्यक्त केली.
यावेळी शेतकरी उमेश कागले यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "आमच्यासाठी हे रोजचेच झाले आहे. हातकणंगलेमधील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त काळे सांडपाणी नाल्यातून नदीत जाते. मध्यरात्री २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सांडपाण्याचा प्रवाह मोठा असतो. त्यानंतर हे प्रमाण कमी असले तरी काळे पाणी दिवसभर नदीमध्ये मिसळतच असते. याचा त्रास फार होतो. पावसाळ्यात या भागात हे रसायनयुक्त पाणी शेतात येते. त्यामध्ये ऊस बुडतो. त्यामुळे थोड्याच दिवसांत ऊस काळा पडून कुजतो. म्हणून आता त्याभागात उसाची लावण करणेच बंद केले आहे. वर्षाकाठी लाखभराचे नुकसान सहन करावे लागते. दुर्गंधी तर कायमचीच झाली आहे. नदीच्या खालच्या प्रवाहाला असणाऱ्या गावांनी तर नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणेच बंद केले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस खूप कठीण होत चालली आहे". असे कागले यांनी सांगितले.
इचलकरंजी महापालिकेत पाण्याची समस्या नित्याचीच
रूईपासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या इचलकरंजी महापालिकेला या नदीचेच पाणी पुरवले जाते. दरम्यान अशीच परिस्थिती इचलकरंजीत आहे. शहरातील मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट नदीत मिसळणे सुरूच आहे. इचलकरंजीत उद्योजकांनी स्वखर्चातून औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. येथे दररोज सहा ते सात एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेले पाणी शेतासाठी दिले जाते.
याशिवाय पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या गावांमधील छोट्या उद्योगांचे सांडपाणीही नदीत मिसळले जाते. याची प्रशासनाकडे कुठेही नोंद नाही. शिरोळ तालुक्यातील काही दिवसांपूर्वी तेरवाड बंधारा येथे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मेल्याची घटना घडली. आठवडा उलटला तरीही तेरवाड बंधाऱ्यावरील मासे नदी पात्रात तरंगताना दिसतात. नदीच्या काठाला मृत माशांचा खच आहे.
शेतजमीन क्षारपड, जनावरांचे आरोग्य धोक्यात
कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेल्या पंचगंगा नदीत प्रत्येक वर्षी मासे मरण्याचा घटना घडत असतात. मात्र, यावर काहीही ठोस उपाययोजना किंवा कोणावर कारवाई होताना पहायला मिळत नाही. ‘मासे मरण्याचे प्रकार आता सर्रास घडत आहेत. सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग बदलला आहे, वास येत आहे. जनावरांना नदीचे पाणी देता येत नाही. शेतजमीन यामुळे क्षारपड होत चालली आहे. उसावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सांडपाणी नदीत मिसळणे कधी थांबणार, हाच प्रश्न सामान्य लोक विचारत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.