
Pune News: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पशुपालन उद्योग आता पारंपरिकतेकडून उद्योजकतेकडे चालला आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, खासगी उद्योग, बँक या सर्वांना एकत्र आणून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे.
विशेषतः महाराष्ट्र राज्याला यामध्ये मोठी संधी आहे, असे मत केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन, दुर्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायत राज विभागाचे मंत्री राजीव रंजन सिंह यांनी व्यक्त केले.
पुण्यात सोमवारी (ता. १३) झालेल्या राष्ट्रीय पशू उद्योजकता विकास परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन डेअरी मंत्रालयाचे राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, जॉर्ज कुरियन तसेच राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल, पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंढे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, विधान परिषद सदस्या उमा खापरे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, केंद्रीय सचिव अलका उपाध्याय, अतिरिक्त सचिव वर्षा जोशी, केंद्रीय आयुक्त, डॉ. अभिजित मित्रा, राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामस्वामी, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे आणि देशभरातील पशू संवर्धन विभागाचे अधिकारी, पशू तज्ज्ञ उपस्थित होते.
राज्याचा पशुसंवर्धन आणि डेअरी विभाग आणि केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालय यांच्या माध्यमातून आज राष्ट्रीय पशू उद्योजकता विकास परिषद- २०२५ आयोजित करण्यात आली होती.
परिषदेत मार्गदर्शन करताना राजीव रंजन सिंह म्हणाले की, ग्रामविकासामध्ये पशुपालन हा केंद्र बिंदू आहे. यावरच ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार, आरोग्य अवलंबून आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय पशुपालन मिशन आणि पशू संवर्धन पायाभूत विकास फंड या योजनांना गती दिली आहे. यातून पशुपालक हा प्रक्रियादार आणि उद्योजक होत आहे. येत्या काही वर्षांत देशातील नऊ राज्ये लाळ्या खुरकूत मुक्त होत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या समावेश आहे.
राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल, पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंढे म्हणाल्या की, महिला पशुपालकांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पशू आरोग्यावर भर देत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योजक तयार करण्यावर माझा भर असणार आहे. त्यादृष्टीने विविध योजनांना चालना देण्यात येत आहे. बँकांनी यासाठी योग्य सहकार्य करावे.
या परिषदेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, जॉर्ज कुरियन यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा आढावा घेतला.
परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या नव्या योजनांचा प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते देशभरातील प्रयोगशील पशुपालक, पशू क्षेत्रातील उद्योजक, पशुसंवर्धनात आघाडीवर असलेल्या राज्य सरकारांचा पशुसंवर्धन विभाग आणि पशुसंवर्धन प्रकल्पांना विशेष सहकार्य करणाऱ्या बँकांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
राजीव रंजन सिंह यांच्या भाषणातील मुद्दे
१) भारत जगात दूध उत्पादनात प्रथम, अंडी उत्पादनात दुसरा, मांस उत्पादनात चौथ्या क्रमांकावर.
२) पशुपालनात उद्योजक घडवण्यावर भर. योजनांसाठी भरीव तरतूद. निर्यातक्षम पशू आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनासाठी संशोधन, तंत्रज्ञान विस्तार, पशुपालनात माहिती तंत्रज्ञान वापराला प्राधान्य.
३) बँकांनी लहान शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, सहकारी संस्था, खासगी पशू उद्योजक यांना तत्काळ आणि योग्यदरात अर्थसाहाय्य करावे, कागदपत्राच्या अडचणी कमी करा.
४) जातिवंत पैदास, दूध उत्पादन वाढीसाठी पशुपालकांनी लिंग वर्गीकृत रेतमात्रा, भ्रूण प्रत्यारोपण, स्वच्छ दूध निर्मिती तंत्रावर भर द्यावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.