
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा विपरीत परिणाम काजू पिकावर दिसून येऊ लागला आहे. अनेक भागांतील काजू कलमांना आलेला मोहर करपला असून, वातावरणामुळे फुलकिडी आणि फळ खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा परिणाम काजू उत्पादनात होणार असल्याने काजू उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात या वर्षी काजूला पालवी आणि मोहर विलंबाने आला. परंतु चांगल्या थंडीमुळे काजू कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आला. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा काजू उत्पादकांना होती. परंतु जानेवारी अखेरीला धुक्याचे प्रमाण वाढले आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३७ अंश सेल्सिअसवर गेले.
४ फेब्रुवारीपासून एक-दोन दिवसांचा अपवाद वगळला तर सातत्याने ३७ अंश सेल्सिअस इतके तापमान राहिले आहे. त्याचा मोठा विपरीत परिणाम आता काजू पिकांवर दिसून येऊ लागला आहे. काजूला आलेला अधिकतर मोहर करपला आहे. याशिवाय फुलकिडी, बी आणि बोंड खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मोहर करपल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहरापासून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असते. परंतु झाडांवरील सर्व मोहर करपत चालला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पंधरा दिवसांतून एकदा पाणी देण्याचा सल्ला
वाढलेल्या तापमानाचा काजू पिकांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे काजू उत्पादकांनी तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी पंधरा दिवसांतून एकदा प्रतिझाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. याशिवाय बोंड पोखरणाऱ्या अळीकरिता प्रोफेनोफॉस १५ मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठीचे) असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे यांच्याकडून देण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.