
Satara News : दर वर्षी ग्रामपंचायतींची करवसुली शंभर टक्के होत नसल्याने थकीत रकमेचा आकडा दिवसेंदिवस वाढतो. यासाठी पर्याय म्हणून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत चालू वर्षींचा संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतदारांना पाच टक्के सवलत दिली जात आहे.
त्यामुळे २०२३-२४ या चालू वर्षासाठी जिल्ह्यातील मिळकतदारांनी योजनेचा लाभ घेऊन कराची रक्कम भरून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत विभागाने केले आहे.
जिल्ह्यात एक हजार ४८५ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना मिळालेल्या कराच्या रकमेतून गावचा बहुतांश विकास अवलंबून असतो. मात्र, गावोगावी नागरिक ग्रामपंचायतीच्या सर्व सवलतींचा लाभ घेऊनही कर भरण्यास टाळाटाळ करताना दिसून येते.
दर वर्षी ३१ मार्चपूर्वी ग्रामपंचायतीला कर भरणा करणे क्रमप्राप्त असते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींची वसुली होत नसल्याने शंभर टक्के करवसुली होत नाही. यासाठी शासनाने विविध सवलतींच्या योजना काढल्या आहेत.
जेणेकरून, करवसुली जास्तीत-जास्त होण्यास मदत होणार आहे. यामध्ये मिळकतदारांनी सर्व कर एकाच वेळी भरल्यास त्यांना पाच टक्के सवलत मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली सरासरी ७५ टक्के झाली आहे.
दरम्यान, या वर्षाच्या कर भरण्यावर पाच टक्के सवलतीची जनजागृती ग्रामपंचायत स्तरावर केली जात आहे. काही ठिकाणी फलकांद्वारे, पत्रकाद्वारे माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. नागरिकांनीही शासनाच्या योजनेला प्रतिसाद देत पुढील सहा महिन्यांत संपूर्ण कर भरणा करावा, असे आवाहन ग्रामपंचायत विभागाने केले आहे.
थकीत असणाऱ्यांना दंड...
कर आकारणी करण्यात येणाऱ्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत संपूर्ण कर भरल्यास एकूण रकमेवर पाच टक्के सवलत देण्यात येते.
त्याप्रमाणे या वर्षातील कराच्या रकमेचा भरणा न केल्यास थकीत कराच्या रकमेवर दर वर्षी पाच टक्के दंडही आकारला जातो. त्यामुळे नागरिकांनी दर वर्षी कराची आकारणी वेळेवर करणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.