Ahilyanagar News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा व अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही दुर्लक्षित आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजाचीसुद्धा सामूहिक जबाबदारी आहे. त्याच भूमिकेतून ‘आपला मावळ’ने या जलदुर्गाच्या जतनासाठी पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले..अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘आपला मावळा’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावर गड संवर्धन, स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. नीलेश लंके यांच्यासह सहभागी तरुणांनी किल्ला परिसर स्वच्छ करण्याचे काम केले. यावेळी शिवराजे देवस्थानचे अध्यक्ष सयाजी सपकाळ, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, ‘आपला मावळा’चे अध्यक्ष रामेश्वर निमसे, सचिव सीताराम काकडे आदी उपस्थित होते..Heritage Trees: हजारो पावसाळे बघितलेली प्राचीन झाडे.गडावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल व अन्य वस्तू संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले. डस्टबिन आणि बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली. पायवाटा मोकळ्या करून गडाच्या संरचनेला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली..Heritage Trees: हजारो पावसाळे बघितलेली प्राचीन झाडे.यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, ‘‘शिवरायांचे गड हे आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत. सिंधुदुर्गसारखा सागरी किल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आहे. राज्यातील गडांची होत असलेली उपेक्षा वेदनादायी आहे. सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या वारशांचे संरक्षण केले पाहिजे. ‘आपला मावळा’च्या माध्यमातून गडसंवर्धनाचा हा लढा पुढेही सुरूच राहील.’’.या मोहिमेतून युवा पिढीत इतिहासाविषयी अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. इतिहासाचे जतन करणे ही केवळ भावनिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या उपक्रमातून समाजाला व विशेषतः तरुण पिढीला मिळत आहे.- नीलेश लंके, खासदार