Bitter Gourd Cultivation : कारले लागवड ठरली आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

Bitter Gourd Cultivation : कारले लागवड आर्थिकदृष्ट्या कशी फायदेशीर ठरते तसेच कारले लागवडीविषयीचे योग्य नियोजन आणि माहिती या लेखातून पाहुयात.
Bitter Gourd
Bitter GourdAgrowon

शेतकरी नियोजन

पीक : कारले

शेतकरी : बापू बाळू जोंधळे

गाव : जऊळके दिंडोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

कारले लागवड : १ एकर

नाशिक जिल्ह्यातील जऊळके दिंडोरी (ता. दिंडोरी) येथील बापू बाळू जोंधळे यांची १० एकर शेती. पूर्वी प्रामुख्याने द्राक्ष हे प्रमुख पीक घेतले जात असे. मात्र नंतरच्या काळात नैसर्गिक आपत्ती, उत्पादनावर होणारा परिणाम, वाढता उत्पादन खर्च ही आव्हाने

निर्माण झाल्याने द्राक्ष बाग काढण्याचा निर्णय घेतला. त्यास पर्याय म्हणून द्राक्ष बागेच्या उपलब्ध स्ट्रक्चरचा वापर करून वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे नियोजन करण्याचे ठरविले. एकत्रित कुटुंब असल्याने

बहुपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यात प्रामुख्याने टोमॅटो, कांदा यासह कारले, गिलके व वालपापडी या पिकांची लागवड करण्यात येत आहे.

लागवड पूर्वनियोजन

लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमीन आवश्यक होती. त्यानुसार टोमॅटो लागवड केलेल्या क्षेत्रामध्येच कारले लागवडीचा निर्णय घेतला.

टोमॅटोचा हंगाम संपल्यानंतर त्यावरील बेडवर कारले लागवडीसाठी पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली. मागील हंगामातील टोमॅटो पिकाचे अवशेष शेताबाहेर काढून शेत स्वच्छ करून घेतले.

लागवडीच्या नियोजनानुसार लागवडीसाठी दर्जेदार उत्पादन देणारे कारले वाणाची निवड केली. त्यासाठी रोपवाटिकेतून रोपांची उपलब्धता केली. लागवड नियोजनानुसार एकरी ३ हजार रोपांची उपलब्धता करून घेतली.

गेल्या दोन वर्षांपासून बापूराव हे कारले लागवड करत आहेत. त्या अनुभवातून आलेल्या अडचणींवर टप्प्याटप्प्याने मात करत सुधारणा केल्या आहेत. लागवड करण्यापूर्वी भरखते दिली जातात. त्यानंतर द्राक्ष बागेतील उपलब्ध स्ट्रक्चरनुसार ३ बाय ८ फूट या अंतराने लागवड करण्यात येते. दोन रोपांत ३ फूट आणि दोन ओळींमध्ये ८ फुटांची जागा मोकळी राखली आहे.

रोपांची उपलब्धता केल्यावर साधारण १० नोव्हेंबरला कारले लागवड केली.

Bitter Gourd
Bitter Gourd : कारले पिकात मिळवली 'मास्टरी'

लागवडीपश्चात नियोजन

सध्या कारले लागवड करून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे.

कारल्याच्या वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ चांगली होते. तसेच नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो. फळधारणा चांगली होते. दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर ठरते.

रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर ५ ते १० दिवसानंतर वेलीवर चढण्यासाठी वेलीलगत जाळी पसरून घेतली जाते. जेणेकरून वेलीला वाढीस चालना मिळेल आणि तिची कक्षा पसरून आधार मिळेल.

स्ट्रक्चरच्या वरील भागात तारा असतात. मात्र मोकळ्या भागात वेल पसरण्यासाठी मंडपाच्या वरील भागांत नायलॉन जाळी अंथरूण घेतली जाते. त्यामुळे वेलीची वाढ चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे फळांना इजा होत नाही. शिवाय फुलकळी घासून ती गळून पडणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाते.

कीड-रोग व्यवस्थापन

वाढीच्या अवस्थेत कारले पिकावर प्रामुख्याने विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पीक उत्पादनाचा दर्जा खालावण्याची शक्यता अधिक असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी पिकाचे निरिक्षण केले जाते. यासह पांढरी माशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊन पाने तसेच शेंड्यावर विपरीत परिणाम होतो.

नागअळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने खराब होऊन समस्या निर्माण होतात. वेलींमध्ये विकृती येऊन अडचणी वाढतात. त्यामुळे हा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर केला जातो. जेणेकरून लागवड क्षेत्रात होणारा कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाईल. आणि दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य होते.

पिकाचे वेळोवेळी निरीक्षणे नोंदवून गरजेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केली जाते.

रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे चिकट सापळे तर फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावले जातात.

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीप्रमाणे उपाययोजना केल्या जातात.

Bitter Gourd
Tomato : वरूडकाजी, हिरापूर झाले टोमॅटो, कारल्याचे ‘क्लस्टर’

विक्री नियोजन

लागवडीनंतर साधारणपणे ५० दिवसानंतर फळ तोडणी तयार होतात. मात्र थंडीच्या दिवसात फळांची वाढ उशिराने होत असल्याने ६० ते ६५ दिवसानंतर फळ तोडणीस येतात. सुरुवातीच्या टप्प्यात तुलनेने कमी माल निघतो. मात्र नंतरच्या काळात उत्पादन वाढू लागताच मजुरांचे नियोजन करून काढणीच्या कामांस सुरुवात केली जाते.

त्यानंतर फळांची हाताळणी व प्रतवारी करून उत्पादित मालाची नाशिक व जवळील बाजारपेठेत विक्री केली जाते. अपेक्षित दर मिळविण्यासाठी उत्पादनाचा दर्जा चांगला राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार गुणवत्तापूर्ण उत्पादनाला बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत होते.

कारले लागवडीचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी एकरी साधारण १ हजार ते १२०० क्रेट कारले उत्पादन मिळाले होते. त्यास साधारण २५ ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला होता, असे बापूराव सांगतात.

खत व्यवस्थापन

लागवड केल्यानंतर वेलींना वाढीच्या अवस्थेत खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यावर उत्पादकता व गुणवत्ता अवलंबून असते.

सध्या थंडीचे दिवस असल्याने वेलीची वाढ होण्यासाठी कोंबडी खताची स्लरी आळवणीच्या स्वरूपात दिली जात आहे.

रासायनिक खतांमध्ये १२:६१ः०, ०:५२ः३४, १९:१९:१९, २३:२३:०, ०:०:५०, १३:०:४५ या या प्रमाणे खतमात्रा दिली जात आहे.

वेलीची वाढ, फुलधारणा, फुगवण व फळ वाढीसाठी टप्प्याटप्प्याने खत देण्याचे नियोजन केल्याने उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी फायदा होतो.

- बापू बाळू जोंधळे, ९८२२४७१७२९

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com