Bidri Sugar Factory : बिद्री कारखान्याच्या घडामोडीमुळे निवडणुकीत रंगत, मेहुणे पाहुण्यांची युती तुटली

Bidri Sugar Factory Election : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढत आहे.
Bidri Sugar Factory
Bidri Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Bidri Sugar Factory News : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी (बिद्री) साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसून येत आहे. दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे मेहुणे अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीच त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

ए. वाय. यांनी पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केली. नव्या घडामोडीमुळे कारखान्याच्या निवडणुकीत रंगत येणार असून, समाधानकारक जागा न मिळाल्याने निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार तालुक्यांचे कार्यक्षेत्र आणि सर्वाधिक ६२ हजारांहून अधिक सभासद असलेल्या दरातही उच्चांकी परंपरा अबाधित ठेवणाऱ्या 'बिद्री' कारखान्यासाठी ३ डिसेंबरला मतदान होणार आहे. उद्या (ता. १७) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून, त्याच्या पूर्वसंध्येलाच सत्तारूढ गटाला धक्का देत ए. वाय. पाटील यांनी विरोधी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ए. वाय. पाटील हे २००९ पासून कारखान्यात संचालक आहेत.

२०१० ते २०१३ या काळात ते उपाध्यक्ष होते. कारखान्याचे सुमारे ६० हजारांहून अधिक सभासद आहेत. विधानसभेच्या उमेदवारीवरूनच या दोघांत २००९ पासून छुपा संघर्ष होता. विधानसभेला तुम्हाला पाठिंबा हवा असेल, तर कारखान्याची सत्ता आपल्याकडे द्यावी, अशी ए. वाय. यांची इच्छा होती; पण विधानसभा व कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीतून या दोघांतील संघर्ष संपवला जायचा. या दोघांच्या वादात राष्ट्रवादीची विधानसभेची जागाही गेली, त्यातून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या दोनवेळच्या आमदारकीचा मार्गही सुकर झाला होता.

यावेळच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील दोन गटांतील सहा जागांवर मी सांगेल त्याला उमेदवारी द्यावी, निवडणुकीनंतर कारखान्याचे अध्यक्षपदही आपल्याला मिळावे, अशी मागणी ए. वाय. यांनी सत्तारूढ गटाचे नेते म्हणून के. पी. पाटील यांच्याकडे केली होती. यावरून गेल्या पंधरा दिवसांपासून खल सुरू होता, पण ही चर्चा फिसकटल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वीच सत्तारूढ गटासोबत न जाण्याचा निर्णय ए. वाय. यांनी घेतला होता. तसे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. आज पत्रकार परिषद घेऊन ए. वाय. पाटील यांनी या वादावर पडदा टाकतानाच आपण विरोधकांसोबत असल्याचे जाहीर केले.

पहिल्यांदाच विरोधात

माजी आमदार के. पी. पाटील यांच्या भगिनी अर्चना पाटील या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या पत्नी आहेत. गेली अनेक वर्षे कारखाना व विधानसभेच्या राजकारणात ही मेहुण्या पाहुण्यांची जोडी एकत्र होती. आता बिद्रीपासून त्यांच्यात सुरू झालेला संघर्षाचे पडसाद पुढच्यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहेत.

राधानगरी तालुक्यावर प्रभाव

सत्ताधाऱ्यांविरोधात गेल्या दहा वर्षांपासून आमदार प्रकाश आबिटकर संघर्ष करत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेची पेरणी केली आहे. आता त्यांना ए. वाय. यांची साथ मिळणार आहे. राधानगरी तालुक्यात कारखान्याचे सर्वाधिक सभासद आहेत, त्यांच्यावर ए. वाय. यांचा प्रभाव आहे. त्यामुळे 'बिद्री' च्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com