Pune News : मध्य प्रदेशमध्ये शेतकरी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत (MSP) ६ हजार मागत आहेत. त्यासाठी महिन्याभरापासून येथे आंदोलने केली जात आहेत. यावरून भारतीय किसान युनियनने राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात सिओनी माळवा, नर्मदापुरम येथे ट्रॅक्टर मोर्चा सोमवारी (ता.२३) काढला. यावेळी टिकैत यांनी सरकारने शेतकऱ्यांची मागणी करावी. सोयबीनला ६ रूपये हमीभाव मिळावा, अशी मागणी केली.
सोयाबीनच्या भाव वाढवण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू शेतकरी आंदोलन करत आहेत. या मागणीला बीकेयु नेते राकेश टिकैत यांनी काहीच दिवसांपूर्वी पाठिंबा दिला होता. तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा सरकारला दिला होता. यानंतर टिकैत यांनी सोमवारी सिओनी माळवा, नर्मदापुरम येथे शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढली. जो केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मतदारक्षेत्र आहे. या आंदोलनात ३६ शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांनी सुमारे १५०० ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहभाग घेतला.
यावेळी सोयाबीन, गहू आणि धानाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. तर केंद्र सरकारने मध्य प्रदेशसाठी सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रूपये निश्चित केला असला तरी तो कमी आहे. यावर शेतकरी समाधानी नसून सोयाबीनला किमान ६ हजार हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. टिकैत यांनी, आपण शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत असून त्यांच्या मागण्यांसाठी रॅली काढल्याचे म्हटले. तर फक्त सोयाबीनचा हमीभाव वाढविण्यासाठी हा लढा नसून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्य वाचवण्यासाठीचा हा संघर्ष असल्याचेही टिकैत यांनी म्हटलं आहे.
टिकैत यांनी, शेतकऱ्यांच्या आवाजाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये असा इशाराही दिला आहे. तर सरकारने दुर्लक्ष केल्यास अशा छोट्या आंदोलनांना मोठ्या स्वरूप येण्यास वेळ लागणार नाही, असेही टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. हमीभाव वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पण जर केंद्राला ते शक्य नसेल तर मध्य प्रदेश सरकारने बोनस देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन टिकैत यांनी केले आहे. सोयाबीनच्या खरेदीवरून देखील टिकैत यांनी राज्य सरकारवर निशाना साधला. टिकैत यांनी, सरकार सोयाबीन खरेदीच्या जागा बदलत असून शेतकऱ्यांसाठी मार्केटच योग्य ठिकाण असल्याचे म्हटले आहे.
सरकारचा दिलासा देण्याचा देखावा
सध्या मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे एकूण उत्पादन सुमारे ६० लाख मेट्रिक टन झाले आहे. परंतु केंद्र सरकारने मध्य प्रदेशसाठी हमीभावावर केवळ १३.६८ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळेच येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून वाढीव हमीभावात अधिक सोयाबीन खरेदी सरकारने करावे, अशी मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या दबावामुळे मध्य प्रदेश सरकार अतिरिक्त सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीनवर बोनस देण्याचा विचार सुरू असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.