Pune News : ‘‘या देशात शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळू लागताच त्याच्या शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी घातली जाते. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. केळी, संत्रा, कांद्याविषयी केंद्राने शेजारील राष्ट्रांशी चर्चा करून आयातीमधील अडथळे दूर करायला हवेत,’’ अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
‘व्हीएसआय’ येथे बुधवारी (ता.११) वार्ताहरांशी बोलताना श्री.पाटील यांनी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली. “कांदा उत्पादक भाग असलेल्या नाशिक भागात पंतप्रधान दौरा करीत आहेत.
कांदा निर्यात बंदी उठविण्याची तेथील शेतकऱ्यांनी केलेली मागणी पंतप्रधानांनी ऐकली पाहिजे. मला वाटत नाही पंतप्रधान त्यांचे ऐकतील. मात्र, अशी मागणी करणाऱ्यांनाच सरकारकडून ताब्यात घेतले जात आहे. त्यांची राज्य करण्याची ही अशीच पध्दत आहे.”
शिवसेनेच्या दोन गटांमधील आमदार अपात्रतेबाबत विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निकालाबाबत ते म्हणाले, “दोन्ही बाजूंनी अपात्रतेबाबत मागणी करणाऱ्या याचिका होत्या. मात्र, कोणत्याही आमदाराला अपात्र ठरविण्यात आलेले नाही हा अगदी आश्चर्याचा भाग आहे.
निकालाच्या आधीच काहींच्या भेटीगाठी झाल्याने संशय वाढलेला होता. प्रतोदाबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रभू यांना मान्य केल्यानंतरदेखील वेगळे प्रतोद ग्राह्य धरुन निकाल दिलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सहकारी आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जातील अशी आम्हाला खात्री आहे.”
‘राष्ट्रवादी’मधील वादाबाबतच्या निकालाबाबत पाटील म्हणाले,‘‘अध्यक्षांना परिस्थिती पाहून पुढे जावे लागेल असे मला वाटते. आमची बाजू मेरिटची असून ती अध्यक्षांसमोर अद्याप मांडायची आहे. त्यापूर्वीच पूर्वग्रहदूषित होत अध्यक्षांसमोर जाणे व काही विधाने करणे मला योग्य वाटत नाही.”
पक्षाबरोबरील आमदारांच्या आकडेवारीबाबत पाटील यांनी ‘तुम्ही शोधपत्रकारिता करावी. प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देणार नाही. आम्ही किती आहोत त्याविषयी याचिकांमध्ये माहिती आलेली आहे,’’ असे सांगितले.
व्हीएसआयच्या बैठकीतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत पाटील म्हणाले, “राज्याचा साखर उद्योग हा मोठा विषय आहे. सरकारच्या वतीने सहकारमंत्री येथे आलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यायचे की नाही, त्यांना निमंत्रण दिले की नाही, याबद्दल तपशील नाही. बहुतेक दिले असेल पण ते कार्यबाहुल्यामुळे आलेले नाहीत.’’
‘वयाच्या उल्लेखामुळे पाठिंबा वाढतोय’
‘‘जितक्या वेळा साहेबांच्या वयाचा उल्लेख होत गेला त्या त्यावेळी साहेबांबाबत लोकांची मते अधिक भक्कम होत गेली आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला बोलायचे आहे त्यांनी बोलत राहावे. साहेबांना जनता ओळखून आहे. उलट साहेबांना हळूहळू पाठिंबा वाढत आहे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.