
Nanded News : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक शुक्रवारी (ता.१३) घेण्यात झाली. बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कट्टी, टपाल खर्च आणि पत्ती यासंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निर्णयास व्यापाऱ्यांनी संमती दर्शविल्याने जिल्हाधिकारी कर्डिले यांनी समाधान व्यक्त केले.
खासदार रवींद्र चव्हाण यांनी केळीचे क्लस्टर करण्यासाठी ऐतिहासिक भूमिका घेतल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन सुविधा प्राप्त होणार आहेत. यात प्रामुख्याने व्यापारी संकुल, कोल्ड स्टोरेज, निर्यातीसाठी अनुकूल व्यवस्था, केळीशी संबंधित वेगवेगळी आदाने अशा प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत.
तसेच अडत आणि कट्टीच्या नावाखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांची चालू असलेली लूट यामुळे शेतकरी हवालदिल होता. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केळी व्यापारी आणि शेतकरी यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती.
यावेळी केळी व्यापाऱ्यांच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कर्डिले यांनी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात शेतकऱ्यांकडून घेतला जाणारा टपाल व बीजक खर्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आला. त्याचबरोबर केळीच्या चिल्लर कॅरेट गाडीवरील १२ कट्टी रद्द करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक काट्यावर कॅरेटचे वजन यापुढे ग्राह्य धरले जाणार आहे. यासोबत ११ टक्के पत्ती कपात १० टक्के करण्यात आली.
या तीनही बदलांमध्ये व्यापाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि केळी उत्पादक शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले. जळगाव भागातील केळी व्यापार तरतुदीचा आढावा घेण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
त्यानंतरच गाडीला लावली जाणारी ''पत्ती'' व त्यातील तफावत तसेच ''सहा टक्के'' आडत यासंदर्भात विस्तृतपणे आढावा घेऊन पुढील बैठकांमध्ये शेतकरी वर्ग आणि व्यापारी यांच्या समन्वयातून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मत यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.
तसेच व्यापाऱ्यांकडील इलेक्ट्रॉनिक काट्यांची वेळोवेळी तपासणी करण्यासंदर्भातही संबंधित विभागाशी चर्चा करू असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात केळीचा संघ तयार केला जाईल, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पंचवीस वर्षात सर्वात प्रथमतः दिलासा दिल्याबद्दल सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील काळात व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन शेतकरी हिताचे निर्णय त्यांच्याकडून होतील, अशीच नांदेड जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे.
या बैठकीस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, प्रताप देशमुख, नीलेश देशमुख, प्रा. संदीपकुमार देशमुख, माधव बिरादार, ओम पवार, व्यंकटी पवार, राम लाडाजी, माधव पवार, अमोल देशमुख, महेश श्रीरामवार, बाळासाहेब लहानकर, अन्वर शेठ यासह मुदखेड आणि अर्धापूर भागातील केळी उत्पादक शेतकरी बैठकीला उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.