
Pune News: कृषी आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी अशोक किरनळ्ळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यमान निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर व विस्तार संचालक रफिक नाईकवाडी यांना पदावनत करून सहसंचालकपदावर नियुक्त करण्यात आले आहे. राज्याचे फलोत्पादन संचालक म्हणून अंकुश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात संचालकांची रिक्त पदे भरण्यासाठी विहीत पात्रता असलेले अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे चक्क संचालकपद अवनत करण्याची शक्कल लढविण्यात आली. त्यामुळे नियमानुसार पात्रतेचे निकष पूर्ण करत नसतानाही सहसंचालक पदावरील अधिकाऱ्यांना संचालक पदाची तात्पुरती बढती देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्या कामी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा होती. सुनील बोरकर यांनी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपद पटकावले.
या मलईदार पदावरील नियुक्तीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जुंपली. श्री. बोरकर यांच्या नियुक्तीच्या विरोधात तत्कालीन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) दाद मागितली. मॅटचा निकाल येण्याआधीच ते सेवानिवृत्त झाले. मॅटने या प्रकरणाचा निकाल देताना कृषी संचालकपदासाठी बेकायदेशीरपणे दिलेल्या बढत्या म्हणजे शासकीय व्यवस्थेचा ‘निर्लज्ज’ व ‘अविवेकी’ प्रकार आहे, असे गंभीर ताशेरे ओढले. त्यामुळे कृषी विभागाला संचालक पदावर बढती दिलेल्या अधिकाऱ्यांची पदावनती करणे भाग पडले.
दोन्ही संचालक झाले सहसंचालक
कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्री. बोरकर यांना पूर्णवेळ संचालकपदावरून हटवले गेले आहे. पात्रतेनुसार ते आता मृद्संधारण विभागाचे पूर्णवेळ सहसंचालक असतील आणि ‘आत्मा’च्या संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी त्यांच्याकडे असेल. आत्माचे विद्यामान संचालक अशोक किरनळ्ळी यांना निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे पूर्णवेळ संचालक करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांना देण्यात आला आहे. रफिक नाईकवाडी यांनाही विस्तार व प्रशिक्षण विभागाच्या पूर्णवेळ संचालकपदावरून हटविण्यात आले आहे. ते आता विस्तार विभाग- कक्ष दोनचे पूर्णवेळ सहसंचालक असतील. मात्र विस्तार विभागाला पूर्णवेळ नवीन संचालक मिळेपर्यंत संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी त्यांच्याकडेच असेल.
राज्याच्या फलोत्पादन संचालकपदाची पूर्णवेळ जबाबदारी अंकुश माने यांना देण्यात आली आहे. ते सध्या अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालक आहेत. डॉ. मोते निवृत्त झाल्यानंतर फलोत्पादन संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. किरनळ्ळी यांच्याकडे देण्यात आला होता. श्री. माने यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांना देण्यात आला आहे.
शासनाकडून सारवासारव
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संचालकपदी निवडक अधिकाऱ्यांना बेकायदेशीर बढत्या दिल्यामुळे प्रशासनात नाराजी होती. परंतु राज्य शासनाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. मात्र ‘मॅट’ने गंभीर ताशेरे ओढल्यामुळे शासन भानावर आले. अधिकाऱ्यांना पुन्हा पदावनत करीत शासनाने एक प्रकारे चूक मान्य केली आहे. मात्र ‘संचालकपदासाठी अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळेच तात्पुरत्या स्वरूपासाठी बढत्या दिल्या होत्या. मात्र मॅटने बढत्यांचे आदेश रद्द केल्याने आता नवी पदस्थापना व अतिरिक्त कार्यभार दिले आहेत,’ अशी सारवासारव आता शासनाकडून केली जात आहे.
कृषी अभियांत्रिकी संचालकपदाची निर्मिती
राज्यात फलोत्पादनाप्रमाणेच कृषी अभियांत्रिकी संचालनालय नव्याने तयार करण्यात आले आहे. त्याचा प्रमुख म्हणून स्वतंत्र संचालक नेमण्यात येणार आहे. सध्या ही जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात फलोत्पादन संचालक अंकुश माने यांच्याकडे देण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.