Kharif Hangam : हंगामपूर्व हमीभाव जाहीर करण्यास केंद्र सरकारचा खो

Kharif Season Update : खरीप हंगाम पूर्व हमीभाव जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना पीक लागवडीचे नियोजन करणे शक्य होते.
Cotton
Cotton Agrowon

Nagpur News : खरीप हंगाम पूर्व हमीभाव जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना पीक लागवडीचे नियोजन करणे शक्य होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारकडून या संदर्भात टाळाटाळ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

केंद्र सरकारकडून दरवर्षी हंगाम पूर्व हमीभाव जाहीर केले जातात. त्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाखालील क्षेत्र वाढ करावी आणि कोणत्या पिकाखालील क्षेत्र कमी करावे याबाबतचे नियोजन करणे शक्य होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून यात अनियमितता असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी देखील आठ जूनच्या दरम्यान हमीभाव जाहीर करण्यात आले होते. परिणामी शेतकऱ्यांना पीक लागवडीचे नियोजन करणे शक्य झाले नाही. अशातच गेल्यावर्षीच्या हंगामात कापसाचे दर बारा हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले होते.

त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी कापसाखालील लागवड क्षेत्रात वाढ केली. परंतु यंदाच्या हंगामात कापसाचे दर ६९०० ते ७००० रुपयांवर स्थिरावले. अशा स्थितीत यंदाच्या हंगामात कोणत्या पिकाची लागवड करावी, या बाबतचे नियोजन करण्यासाठी त्यांना हमीभाव समजणे गरजेचे असताना त्याबाबतही केंद्र सरकार उदासीन असल्याने शेतकरी गोंधळात आहेत.

Cotton
Kharif Season : शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे : भाऊसाहेब रुपनवर

दरम्यान राज्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने एक जूनपर्यंत कापूस बियाणे विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत हमीभाव जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना कापूस किंवा सोयाबीन या दोन्हीपैकी एक पर्याय निवडणे शक्य होईल.

राज्यात कापसाच्या दरात घट झाल्यास शेतकरी सोयाबीनचा पर्याय निवडतात, असे समीकरण आहे. अद्याप हमीभाव जाहीर न झाल्याने पीक निवडीबाबत शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत.

हमीभावाच्या आधारे शेतकऱ्यांना पीक लागवडीचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे मे महिन्यातच हमीभाव जाहीर होणे गरजेचे आहे. आतापर्यंत हमीभाव जाहीर झाले असते तर कापूस बाजारातही काही प्रमाणात तेजी आली असती. त्यामुळे शेतकरी हित लक्षात घेता शासनाने तत्काळ हमीभाव जाहीर करावा.
गोविंद वैराळे,ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर
विद्यमान सरकारच्या काळात शेतकरी फक्त भाषणात आणि घोषणातच शिल्लक उरला आहे. परिणामी शेतकरी हिताच्या कितीही गप्पा केल्या आणि आव आणला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांना पीक लागवडीचे नियोजन करण्यासाठी हमीभाव उपयोगी ठरतात. परंतु हंगाम तोंडावर असूनही शासन निर्णय घेत नाही. त्यावरूनच हे सरकार शेतीबद्दल किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com