
Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात थांबून थांबून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने पिकांना फटका बसला आहे. सोबतच खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामातही व्यत्यय निर्माण केला आहे.
आता बरसणारा पाऊस पावसाळ्यात वेळेवर व अपेक्षित बरसेल की नाही, खंडाचे व्यक्त केले जाणारे अंदाज व जाणकार शेतकऱ्यांच्या अनुभवातूनही व्यक्त होणारे खंडाचे कथन यामुळे आधीचा खरीप, रब्बी व आता उन्हाळी हंगाम हातचा जाण्याच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या खरिपाची चिंता लागली आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वहीतीखालील ५४ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी खरिपाचे क्षेत्र ४७ लाख ८७ हजार हेक्टर आहे. येत्या खरीप हंगामासाठी ४८ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यामध्ये कपाशी १३ लाख ९१ हजार हेक्टर, सोयाबीन २४ लाख ८६ हजार हेक्टर, तूर ४ लाख ४४ हजार हेक्टर, मका २ लाख ३१ हजार हेक्टर प्रस्तावित करण्यात आली आहे. एकीकडे कृषी विभागाचे व शेतकऱ्यांचे हंगाम नियोजन सुरू आहे दुसरीकडे अवकाळी पावसाचा जोर मराठवाड्यात अजूनही कायम आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे भारी जमिनीत वाफसा येण्यास विलंब होतो आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीची कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. येत्या २४ मे पासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. यापूर्वी आपल्या जमिनीची मशागतीची कामे उरकून खरिपासाठी जमीन तयार ठेवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.
शिवाय मराठवाड्यातील अनेक भागात दरवर्षी २५ मे नंतर धुळपेरणीलाही शेतकरी पसंती देत असतात. परंतु यंदा मशागतीचीच कामे अजून उरकली नाहीत. आता पुन्हा अवकाळीचा मुक्काम लांबल्यास मशागतीच्या कामात निर्माण झालेला व्यत्यय किती दिवस कायम राहतो यावरही बरेच काही अवलंबून आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.