
Ahilyanagar News : ऊस पिकासह कोणत्याही नगदी पिकांतून शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मिळालेच पाहिजेत, अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची इच्छा आहे. ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उत्पादन वाढीत आम्ही यशस्वी झालो आहोत.
या तंत्रज्ञानाच्या रूपाने शेतकऱ्यांच्या दारात गंगा आली आहे. त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकता वाढवावी, असे आवाहन ‘सकाळ’चे अध्यक्ष व बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी केले.
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, श्रीरामपूर येथील रयत शैक्षणिक संकुल व साई सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एआय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय परिषद सदस्य मीनाताई जगधने होत्या. यावेळी आमदार हेमंत ओगले, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के आदी उपस्थित होते. कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची यशस्विता पाहून ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्टने आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत करार केला. वॉशिंग्टननंतर बारामती हे जगातील दुसरे केंद्र असेल, असे मायक्रोसॉफ्ट ने जाहीर केले व या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.’’
‘‘आम्ही एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात या तंत्राचा यशस्वी वापर केला. त्यातून पाण्याची, औषधे व खतांची आणि खर्चात मोठी बचत झाल्याचे दिसून आले. पाण्याचा एकही थेंब वाया न जाऊ देता एकरी उत्पादन वाढले. अतिरिक्त खतांची, औषधांची मात्रा न दिल्याने शेतीचा पोत सुधारला, उसाचा उतारा वाढला. या संशोधनाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली. ते अभ्यासण्यासाठी कोरिया, ब्राझील, आफ्रिकेतून लोक येत आहेत, हे मोठे यश आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘महाराष्ट्रात उत्पादन होत असलेल्या सहा प्रकारच्या उसावर आम्ही बारामतीत एआय वापरून प्रयोग केले आहेत. यापुढे भाजीपाला, फळपिकांवरही हे तंत्रज्ञान वापरण्याबाबत संशोधन सुरू आहे. भाजीपाल्यावर मोठी औषधफवारणी होते, त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. ते टाळून आरोग्य सुधारण्यास या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.
हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यांच्यासह अप्पासाहेब पवार या दोघांची ही तपश्चर्या आहे. हे तंत्रज्ञान योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी वापरल्यास आपला देश कृषी क्षेत्रात अग्रेसर होऊन जगाला अन्नधान्य पुरवेल,’’ असे पवार म्हणाले.
आमदार हेमंत ओगले म्हणाले, नगर जिल्हा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शरद पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आणले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन समन्वयक डॉ.योगेश फाटके यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस उत्पादनातील नवतंत्रज्ञान’ यावर सखोल मार्गदर्शन करताना या तंत्रज्ञानातील सर्व बारकावे शेतकऱ्यांना सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून सांगितले.यावेळी कोपरगाव, राहाता, राहुरी यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
जुलैपासून शिक्षणातही ‘एआय’ : जगधने
अध्यक्षीय भाषणात मीनाताई जगधने म्हणाल्या, की सतत कामाचा ध्यास असल्याने पवार कुटुंबीयांमध्ये तिघांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला आहे. येथील रयत संकुलमध्ये ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी ८० टक्के शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, या दृष्टीने आज या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.