Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

Weather Update : ९ ते १३ एप्रिल या काळात कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत असेल.
Mango and Watermelon
Mango and WatermelonAgrowon

हवामान अंदाज :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, ता. ९ ते १३ एप्रिल या काळात कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत असेल.

विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस), कोकण विभागात ता. १३ ते १९ एप्रिल दरम्यान कमाल तापमान आणि किमान तापमान सरसरी इतके राहण्याची शक्यता आहे.

उन्हाळी भात

पोटरी ते फुलोरा अवस्था

उन्हाळी भात पोटरी ते फुलोरा अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५-१० सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.

उन्हाळी भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा ४२५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा या प्रमाणे द्यावी.

उन्हाळी मूग

फांद्या फुटण्याची अवस्था

मूग पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. फांद्या फुटण्याच्या वेळीस पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

नारळ

वाढीची ते फळधारणा

नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

Mango and Watermelon
Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

नारळावरील इरिओफाइड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात. नंतर चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भावग्रस्त भागावरील फळांचे आवरण तडकते. परिणामी, नारळ लहान राहतात. लहान फळांची गळ होते.

या किडीच्या नियंत्रणासाठी, ५ टक्के कडुनिंबयुक्त (ॲझाडीराक्टीन १००० पीपीएम) कीटकनाशक ७.५ मि.लि. समप्रमाणात पाण्यात मिसळून वर्षातून तीन वेळा (ऑक्टोबर- नोव्हेंबर, जानेवारी-फेब्रुवारी, एप्रिल-मे महिन्यांमध्ये मुळांद्वारे द्यावे. हे रसायन दिल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत.

याशिवाय नारळावर कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१ टक्का) ४ मि. लि. प्रति लिटर पाणी या द्रावणाची नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी पावसाचा अंदाज घेऊन करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व तयार तसेच कीडग्रस्त नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत. नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी सोडणे पुरावेत आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.

नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडाना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे. माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या सोडणे पुरावेत आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.

काजू

फुलोरा ते फळधारणा अवस्था

दोन दिवसाआड परिपक्व काजू बी व बोंडूची वेचणी करावी. बी बोंडूपासून वेगळे करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर ती उन्हामध्ये ३ दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरीता दर २ तासांनी बियांची उलटापालट करावी.

तीन दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बीची उगवण क्षमता तसेच गरांची प्रत चांगली राखण्याकरिता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोळीमध्ये हवाबंद करावीत. नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी.

फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्यावर उपजीविका करते. त्यानंतर अळी बी व बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेशमार्ग विष्टेच्या साह्याने बंद करते. या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी प्रोफेनोफॉस १.५ मि.लि.

फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणे या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस देण्याची व्यवस्था करावी तसेच नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

Mango and Watermelon
Agriculture Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

सुपारी

फुलोरा ते फळधारणा

सुपारी बागेस ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

नवीन लागवड केलेल्या सुपारीच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

दक्षिण व पश्‍चिम दिशेकडील खोडावर सतत पडणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांमुळे ठरावीक भागातील खोड भाजून निघते. ती जागा खोलगट व काळी पडते. उन्हापासून सुपारीच्या खोडांचे संरक्षण करण्यासाठी भाजणाऱ्या खोडावर गवताचा पेंढा किंवा सुपारीची झावळी बांधावी.

भाजीपाला

फळधारणा

तापमानात वाढ संभवित असल्याने भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.

कलिंगड

फळधारणा

कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला २ ते ३ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फळे काढणीपूर्वी आठवडाभर अगोदर पिकास पाणी देणे बंद करावे.

कलिंगड फळांवर टिचकी मारल्यास तयार फळांचा टण...टण... असा आवाज येतो. तयार फळाचा जमिनीलगतचा रंग पिवळसर झाल्यावर आणि देठाजवळील लतातंतू सुकल्यावर फळांची काढणी करावी.

कलिंगडला ठिबक सिंचनाद्वारे खतव्यवस्थापन करावयाचे असल्यास ९० दिवसांच्या पिकाच्या कालावधीकरीता एकूण नऊ हप्त्यांमध्ये खत व्यवस्थापन करावे. खाली दिलेल्या तक्त्यानुसार खत व्यवस्थापन एक आठवड्याच्या अंतराने करावे.

पीक अवस्था एकूण हफ्ते प्रति एकर प्रति हप्ता खताची मात्रा

१९:१९:१९ युरिया ०:०:५०

सुरुवातीचा कालावधी ३ १२ किलो १९ किलो ४ किलो

वाढीची अवस्था ३ १२ किलो १९ किलो ४ किलो

फळधारणा ३ १२ किलो १९ किलो ५ किलो

आंबा

फळधारणा अवस्था

फळांचे फळमाशीपासून संरक्षण आणि डागविरहित फळे मिळविण्यासाठी, गोटी ते अंडाकृती फळ अवस्थेमध्ये विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ × २० सें.मी. आकाराची कागदी/ वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालतेवेळी फळाच्या देठाकडे इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

फळांची गळ कमी करणे आणि प्रत सुधारण्याच्या हेतूने पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) म्हणजेत १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारणत: १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

पाणी उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे सुपारी आकाराची होईपर्यंत दिल्यास फळांची गळ कमी करावी.

फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. रक्षकर फळमाशी सापळे एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर टांगावेत.

तयार आंबा फळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी फळ काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. काढलेली फळे लगेच सावलीमध्ये ठेवावीत. फळांची वाहतूक शक्यतो रात्रीच्या वेळी करावी.

काढणी पश्‍चात होणाऱ्या बुरशीजन्य फळकुजेपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी. काढणीनंतर फळे पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट ०.०५ टक्का (०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या रसायनाच्या ५० अंश सेल्सिअस उष्णजल द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत.

नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा,

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com