
Pune News : कृषी विभागातील दक्षता पथकाच्या अनिर्बंध कारभाराला कृषी आयुक्तांनी अखेर लगाम घातला आहे. यापुढे चौकशीच्या नावाखाली कोणत्याही कार्यालयात जाऊन धुडगूस घालण्यास दक्षता पथकाला मनाई करण्यात आली आहे.
गैरव्यवहाराच्या संशयावरून राज्याच्या कृषी दक्षता पथकाचे प्रमुख गोविंद मोरे यांना तडकाफडकी हटविल्यानंतर पथकातील उपसंचालक किरण जाधव हेच पथकाचे नेतृत्व करतील, अशी अटकळ अधिकाऱ्यांची होती.
मात्र, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दक्षता पथकाची कार्यकक्षा ठरवणारा नवा आदेश जारी केल्याने कृषी विभागातील ‘सोनेरी टोळी’मध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. कृषी विभागातील कोणत्याही कार्यालयासंदर्भात गैरव्यवहाराची तक्रार आल्यानंतर दक्षता पथक थेट चौकशी करणार नाही.
थेट चौकशीच्या नावाखाली यापूर्वी पथकामधील कर्मचारीच गैरव्यवहार करतात, असा संशय शासनाला होता. त्यामुळे यापुढे दक्षता पथकाने स्वतः चौकशी न करता गैरव्यवहाराची तक्रार असलेल्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमधील दोन स्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहेत, असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.
कृषी आयुक्तांचे नवे आदेश
गैरव्यवहाराचा संशय असलेल्या संबंधित कार्यालयांमधील दोन स्तर वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल दक्षता पथकाने स्वतःकडे घ्यावा. या अहवालाचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. त्यानंतर आपल्या अभिप्रायासह तो आयुक्तांच्या कार्यालयाकडे पाठवावा, असे आदेश आता कृषी आयुक्त श्री. मांढरे यांनी दिले आहेत.
गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश ज्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यानेच संबंधित प्रकरणाची चौकशी करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये चौकशीचे प्रकरण इतर अधिकाऱ्याकडे परस्पर हस्तांतरित करू नये, असेही आदेश आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आयुक्तांनी दक्षता पथकाला कामकाजाची जाणीव करून देतानाच काही अधिकारदेखील दिले आहेत. राज्यातील विभागीय कृषी सहसंचालक किंवा कृषी आयुक्तालयातील संचालकांच्या संदर्भात गैरव्यवहाराच्या तक्रारी असल्यास त्याची दखल दक्षता पथकाने घ्यावी. मात्र अशा तक्रारीची व्याप्ती राज्यभर असल्यास किंवा एखाद्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारी दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी हाताळाव्यात, असे आदेश देत आयुक्तांनी पथकाला बळकट केले आहे.
परस्पर चौकशीला मनाई
एका अधिकाऱ्याने सांगितले, की सहसंचालक किंवा संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार असल्यास त्याची चौकशी दक्षता पथक करणार असले तरी पथकाला आता परस्पर कोणतेही उद्योग करता येणार नाहीत. कारण अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या विरोधात गैरव्यवहाराची तक्रार आल्यानंतर दक्षता पथकाला प्रथम संबंधित कार्यालयाकडून आधी वस्तुनिष्ठ अहवाल मागवावा लागणार आहे.
असा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये गांभीर्य असेल तरच संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी दक्षता पथकाला प्रथम आयुक्तांची मान्यता घ्यावी लागणार आहे. आयुक्तांकडे चौकशीचे अहवाल व त्या संदर्भात शिफारस करताना सुस्पष्ट अभिप्राय द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता दक्षता पथकाला परस्पर उद्योग करण्यास शासनाने मनाई केल्याचे स्पष्ट होत आहे.
किरण जाधव पुन्हा संशयाचा भोवऱ्यात
कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण विभागाच्या कामातील मास्टर म्हणून राज्यभर चर्चेत असलेले उपसंचालक किरण जाधव हे सध्या दक्षता पथकातील प्रमुख आहेत. त्यांच्या विरोधात आमदार सुरेश धस यांनी लेखी तक्रार केल्यामुळे जाधव अडचणीत आले आहेत.
कृषी खात्यात राहून श्री. जाधव स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे निविष्ठानिर्मिती कंपन्या चालवतात, अशी तक्रार आमदार धस यांनी पुराव्यासहित राज्य शासनाकडे केली आहे.
त्यामुळे जाधव यांना दक्षता पथकात ठेवत इतरांच्या गैरव्यवहारविषयक चौकशांची कामे सोपवणे अयोग्य ठरते, असा युक्तिवाद कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.