Solapur News : मोहोळ तालुक्यात गत पावसाळ्यात पडलेला अत्यंत कमी पाऊस, सध्या सुरू असलेले गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष, या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ऐतिहासिक अशा आष्टी तलावातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली. साधारण १५ जुलैपर्यंत हे पाणी टिकवून ठेवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टी तलाव हा ब्रिटिश कालीन आहे. या तलावाची साठवणक्षमता २३.०१ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या तलावात ४९ टक्के पाणीसाठा आहे. या तलावाच्या पाण्यावर एकूण १३ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यापैकी आठ पाणीपुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत.
त्यात माढा, आष्टी, मोडनिंब, तुंगत, येवती, अनगर, रोपळे, खंडाळी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. मोहोळ शहरासाठी मंजूर झालेली ४५ कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे तसेच अनगर व दहा गावे या २०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचेही काम सुरू आहे.
शेतकऱ्यांना पाण्याची चिंता
दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध बँकांची लाखो रुपयांची कर्ज काढून जलवाहिन्या टाकून आपल्या शेतापर्यंत पाणी आणले आहे. त्यात ऊस, केळी या नगदी पिकासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ यासह काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज या वेलवर्गीय पिकांचा व फळभाज्यांचा ही समावेश आहे.
सध्या तलाव परिसरातील वीजपुरवठा खंडित केला आहे. दररोज केवळ दोन तास वीजपुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरू ठेवला जातो. दोन तासांपैकी एक तास जलवाहिन्या भरण्यातच जातो, उर्वरित एका तासात किती पाणी मिळणार, अशी परिस्थिती असताना आता फक्त पिण्यासाठीच पाणी राखीव ठेवल्याने शेतकऱ्यांना त्याची चिंता लागली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.