आधुनिक काळामध्ये किंवा ज्याला आपण उत्तर आधुनिक काळ असेही म्हणू शकतो असा जागतिकीकरणानंतरचा जो काळ आहे, त्या कालखंडामध्ये शेतीबद्दल पत्रकारितेने मध्यवर्ती विचार करायला लागणे, ही अतिशय महत्त्वाची घटना होती. विसाव्या शतकात मासिक किंवा पाक्षिक स्वरूपामध्ये शेतीविषयक लेखन किंवा शेतीविषयक मजकूर काही नियतकालिकांमध्ये येत असे.
वेगवेगळ्या दैनिकांतूनसुद्धा अधूनमधून शेतीविषयक पुरवण्या छापल्या जात. परंतु शेती जीवन आणि व्यवहाराला केंद्र ठेवून एखादे दैनिक काम करू शकते, ही कल्पनाच मुळात सुरुवातीच्या काळामध्ये थोडी वेडगळ वाटावी अशी होती. कारण शेतीविषयक दैनिक रोज कोण वाचेल, त्याला हवा तसा मजकूर मिळेल का आणि तो खरेदी करणारा एक मोठा समूह कुठला असू शकेल, याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये साशंकता होती. ही साशंकता दूर करणारे एक महत्त्वाचे दैनिक म्हणून आपल्याला ‘ॲग्रोवन’कडे पाहावे लागते.
शेतीविषयक लेखनाची आपल्याकडली जी परंपरा आहे, ती प्रामुख्याने लेखकांची. त्यांना आपण क्रिएटिव्ह रायटर किंवा ललित लेखक असे म्हणू शकतो. या लेखकांनी शेती आणि शेती करणारा समूह, एखादा व्यक्ती, एखादं कुटुंब याविषयी आपली निरीक्षणे ललित गद्य-पद्यातून म्हणजे कथा, कविता, कादंबरी या माध्यमांतून नोंदवायला सुरुवात केली.
यासंदर्भात ‘काळ तर मोठा कठीण आला’ या हरिभाऊ आपटे यांच्या कथेचा उल्लेख केला जातो. तसा एकंदरीत विचार केला तर कृषिविषयक साहित्याचे भारतीय जनक म्हणून आपल्याला महात्मा जोतीराव फुलेंकडेच पाहावे लागते. त्यांनी अखंड, शिवाजीचा पवाडा, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म यासारखे कृषिजनकेंद्री जे लेखन केलेले आहे ते अतिशय मूलभूत असे आहे. म्हणून एकूणच भारतीय स्तरावर शेतीविषयक साहित्याचे अग्रणी म्हणून सर्वप्रथम आपल्याला महात्मा फुले यांचे नाव घ्यावे लागेल. याच परंपरेचा एक धागा पुढे आपण ‘ॲग्रोवन’पर्यंत विचारात घेऊ शकतो.
यासंदर्भात ‘काळ तर मोठा कठीण आला’ या हरिभाऊ आपटे यांच्या कथेचा उल्लेख केला जातो. तसा एकंदरीत विचार केला तर कृषिविषयक साहित्याचे भारतीय जनक म्हणून आपल्याला महात्मा जोतीराव फुलेंकडेच पाहावे लागते. त्यांनी अखंड, शिवाजीचा पवाडा, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म यासारखे कृषिजनकेंद्री जे लेखन केलेले आहे ते अतिशय मूलभूत असे आहे. म्हणून एकूणच भारतीय स्तरावर शेतीविषयक साहित्याचे अग्रणी म्हणून सर्वप्रथम आपल्याला महात्मा फुले यांचे नाव घ्यावे लागेल. याच परंपरेचा एक धागा पुढे आपण ‘ॲग्रोवन’पर्यंत विचारात घेऊ शकतो.
ॲग्रोवन हे दैनिक २००५ मध्ये सुरू झाले. या दैनिकाचे पहिले संपादक निशिकांत अनंत भालेराव होते. त्यांना पत्रकारितेचा फार मोठा वारसा होता. अनंत भालेराव हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातले अतिशय लढवय्ये असे क्रांतिकारक नेते. त्यांनी नंतरच्या काळामध्ये दैनिक मराठवाड्याची धुरा सांभाळली आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेचा जो सुधारकी वारसा होता त्याला एका अत्युच्च बिंदूपर्यंत नेऊन पोहोचवले.
मला आठवते शरद पवारांचे लोकपत्र या दैनिकाचे उद्घाटन करतानाचे भाषण. शरद पवार त्या वेळेला असे म्हणाले होते, की महाराष्ट्रातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमच्या मनामध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली, तर आम्ही अनंत भालेराव यांचे अग्रलेख वाचतो. पवार साहेबांचे हे विधान बरेच काही सांगून जाणारे आहे. निशिकांत भालेराव यांना केवळ वडील म्हणून नाही, परंतु एकूणच संस्कार, प्रागतिक चळवळीच्या पातळीवर हा वारसा लाभला होता.
बरेच ठिकाणी आपण बघतो की एखादे दैनिक मोठ्या उत्साहाने सुरू होते, परंतु सुरुवातीचा उत्साह हा काही काळानंतर ओस पडतो. ‘ॲग्रोवन’बद्दल अशा स्वरूपाचा कयास काही लोकांनी सुरुवातीला बांधलाही होता. परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे संपादकीय विभागाला सतत सक्रिय अशा स्वरूपाचा पाठिंबा देणारे प्रकाशक आणि मालक.
‘सकाळ समूहा’बद्दल ही बाब अतिशय गौरवाने नोंदवावी लागेल, की ‘ॲग्रोवन’सारखे अनोखे दैनिक त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने, आपल्या व्यवस्थापन कौशल्यावर तोलून धरले आणि कृषिविषयक दैनिकाचा एक वैभवशाली वारसा निर्माण केला. पूर्णपणे शेती विषयाला वाहिलेले जगातील एकमेव दैनिक म्हणून ‘ॲग्रोवन’चा उल्लेख केला जातो, ही बाब सुद्धा अतिशय भूषणावह आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.