
Sangli News: यंदा सलग पावसामुळे राज्यातील डाळिंब बागायतदारांवर अस्मानी संकट कोसळले आहे. मृग बहरातील डाळिंब बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. परिणामी तीन ते साडे चार हजार हेक्टर म्हणजे १० ते १५ टक्के बागा धोक्यात आल्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. ऐन हंगामात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे, ज्यामुळे त्यांचे वर्षभराचे कष्ट पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत डाळिंब पिकामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. गतवर्षी सुमारे ३० हजार हेक्टरवर मृग बहर धरला होता. हा हंगामात फळांची गुणवत्ता आणि उत्पादन चांगले असते. मे महिन्याच्या मध्यापासून बहर धरण्याचे नियोजन शेतकरी करतो. मात्र, यंदा मे महिन्याच्या मध्यापासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना हा बहर साधता आला नाही. त्यातच जून महिन्यातही पाऊस झाला. अशा परिस्थितीतही दोन टप्प्यात मृग बहर धरला आहे. यंदाही ३० हजार हेक्टरवर हा बहर धरला असल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे.
दरम्यान, बहर धरल्यानंतर अधूनमधून वातावरणात बदल झाल्याने काही प्रमाणात सेटिंग होण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर मधल्या काळात पोषक वातावरण होते. त्यामुळे डाळिंबाचे सेटिंगही चांगले झाले. दोन टप्प्यांत बहर असल्याने बहुतांश बागा फुलोरावस्थेत आहेत. तर काही भागांत ५० ग्रॅम वजनाचे डाळिंबाचे फळ लागले आहे.
परंतु पुन्हा पावसाची रिमझिम, ढगाळ वातावरण या साऱ्याचा परिमाण बागेवर झाला आहे. परिणामी काही भागांत फूलगळ होऊ लागली आहे. या साऱ्यामुळे राज्यातील तीन ते साडे चार हजार हेक्टरवरील बागा अडचणीत सापडल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सलग दुसऱ्या वर्षी फटका
राज्यात गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस झाला होता. या दरम्यान, १५० ग्रॅम वजनाचे फळ होते. या पावसामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी उत्पादनही घटले होते. यंदा बहर धरण्यापासून सतत पाऊस झाला. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासून शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पावसाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
महत्त्वाच्या नोंदी
बदलत्या वातावरणामुळे तेलगट, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव
फूलगळ होऊ लागली आहे, प्रमाणही वाढण्याचा अंदाज
पाकळी करपण्याची शक्यता
मेच्या मध्यापासून पावसामुळे बहर दोन टप्प्यांत
सलग दुसऱ्या वर्षी पावसाने शेतकरी आर्थिक संकटात
वातावरण असेच राहिल्यास तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.