Weekly Weather Update : महाराष्ट्रावर बुधवारपर्यंत (ता.१३) उत्तर भागावर १०१२, तर दक्षिण भागावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील; तर गुरुवारपासून पुढे राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीस सौम्य थंडी व गुरुवारनंतर थंडीत वाढ शक्य होईल. सकाळी व पहाटे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत धुके जाणवेल.
अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान गेल्या काही वर्षांत इतर समुद्रांच्या तुलनेत दीड पट वाढले असून, त्याचाच परिणाम म्हणून जोराचे पावसाचे प्रमाण आणि ढगफुटीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील काही भागांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस, तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस असे जवळपास समान राहील. तसेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहिल्यामुळे हवामानात स्थिरता येईल.
शुक्रवारपासून (ता. १५) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन हवेचे दाब १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल होताच थंडीचे प्रमाणात वाढ होईल. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. हवामान स्थिर राहणे शक्य असल्याने थंडीत चढ- उतार जाणवणार नाहीत. आंबा मोहर निघण्यास हवामान अनुकूल आहे.
कोकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी व सोमवारी अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; तर पालघर जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील; तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ते २२ अंश सेल्सिअस राहील.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ टक्के, तर उर्वरित रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५१ ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ ते २९ टक्के, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमानात घसरण होऊन ते २६ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील; तर उर्वरित नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५२ ते ५७ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३१ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील; तर वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील. कापूस वेचणीस सकाळचे हवामान अनुकूल राहील.
मराठवाडा
परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल हवामान २७ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील; तर धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील;
तर जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील; तर धाराशिव जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५८ टक्के, तर नांदेड जिल्ह्यात ७० टक्के राहील. धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना
जिल्ह्यात ६० ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३६ टक्के राहील व हवामान कोरडे राहील. धाराशिव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ किमी राहील; तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत १० ते ११ किमी आणि परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ८ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील; तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील; तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६१ ते ६५ टक्के राहील;
तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३२ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी ६ किमी राहील; तर उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील व दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील; तर यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील; तर वर्धा जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६२ ते ६८ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील; तर वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील; तर भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८१ ते ८९ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ३५ टक्के आणि चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४५ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी व दिशा इशान्येकडून राहील.
दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र
नगर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. पुणे व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. पुणे व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील; तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.
नगर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील; तर कोल्हापूर जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५९ टक्के राहील;
तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ते ६५ टक्के राहील. सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३९ टक्के राहील; तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात ती ४३ ते ४६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किमी व दिशा नैॡत्येकडून राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रविवारी व सोमवारी १ ते ३ मिमी पावसाची शक्यता आहे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
कृषी सल्ला
जनावरांना रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
थंडीचे प्रमाणात वाढ होताच कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब लावून तापमान वाढविण्याचा प्रयत्न करावा.
आंबा बागेत थंडीचे प्रमाण वाढताच मोहर निघेल. मोहराची काळजी सुरुवातीपासून घ्यावी.
रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.