
Kolhapur News : केंद्र शासनाच्या वित्त विभागाने मोलॅसिस निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. या बाबतचा आदेश केंद्राने सोमवारी (ता. १५) सायंकाळी काढला. यंदाच्या हंगामात उसाचे उत्पादन कमी होत आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या साखर हंगामावर होऊन मोलॅसिसचे उत्पादनही घटत आहे. इथेनॉल निर्मितीही घटण्याची शक्यता असल्याने केंद्राने हे शुल्क लावले आहे.
मोलॅसिसच्या निर्यातीवर बंधने घातली नाही, तर मोठ्या प्रमाणात मोलॅसिस देशाबाहेर जाईल तसेच देशांतर्गत बाजारातही मोलॅसिसची दर आवाक्याबाहेर जाईल या भीतीने केंद्राने हे शुल्क लावले. केंद्राने थेट बंदी न घालता निर्यात शुल्क लावून निर्यात होणार नाही याची दक्षता घेतली आहे. याची अंमलबजावणी गुरुवार (ता. १८)पासून होणार आहे.
साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा साखर उद्योगाला चांगला फायदा होऊ शकेल. साधारणतः ज्या वेळी ऊस, साखरेचे सर्वसाधारण उत्पादन असते त्यावेळी मोलॅसिसची चांगली निर्यात होते.
विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यातून ८ ते १० लाख टन मोलॅसिस निर्यात होते. हे मोलॅसिस विशेष करून तैवान, युरोप, कोरिया, थायलंड या देशांमध्ये जाते. त्याचा उपयोग विशेष करून कॅटल फीडमध्ये म्हणून वापर केला जातो. थायलंडसारख्या देशात काही अंशी डिस्टलरीमध्ये केला जातो.
सध्याचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पहिल्यास मोलॅसिसचा प्रति टनाचा दर १६० ते १७० डॉलर (भारतीय चलनामध्ये १३००० ते १४००० रुपये बंदर पोहोच) इतका आहे. यातील वाहतूक अन्य खर्च सुमारे ३००० रुपये वजा जाता कारखाना पातळीवर ११००० रुपयापर्यंत खरेदी झाली असती.
तथापि यंदा उसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा स्थानिक बाजारातच मोलॅसिसचे दर ११००० ते १२००० रुपयांवर गेले आहेत. याही परिस्थितीत मोलॅसिस खरेदी करून निर्यातदारास परवडले नसते. या नव्या निर्णयाचा विचार केल्यास तब्बल ५००० ते ६००० रुपये निर्यात शुल्क द्यावे लागते.
यामुळे निर्यात होणे केवळ अशक्य आहे. एका वेगळ्या अर्थाने ही एका अर्थाने निर्यातबंदीच लादल्याचे चित्र आहे. या वर्षी इथेनॉलवर निर्बंध आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यामुळे साखर उद्योग हबकला. सध्या सुरू असलेल्या इथेनॉल प्रकल्पधारकांनीही धास्ती घेतली. कर्जे, व्याजाचा हप्ता या बाबत साशंकता निर्माण झाली.
सध्या बी हेवी व उसाचा रस व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉल वरील बंदी अंशतः शिथिल केली असली तरी इथेनॉल प्रकल्पांना दिलासा मिळाला नाही. केंद्राने यावर उपाय काढताना सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे दर वाढविले. पण उच्च मोलॅसिस दरामुळे यापासून इथेनॉल करणे परवडले नसते.
निर्यात शुल्कामुळे मोलॅसिसचे दर कमी होऊन इथेनॉल निर्मिती करणे सुलभ जाईल, याचा फायदा ज्यांच्याकडे डिस्टलरीज आहे त्यांना होऊ शकतो. त्यांना वाजवी दरात मोलॅसिस मिळू शकते. महाराष्ट्राचा विचार केला, तर या निर्णयामुळे ८ ते १० लाख टन मोलॅसिस निर्यात झाले नाही, तर २० ते २५ कोटी लिटर जादा इथेनॉल निर्मिती होऊ शकते.
जगात एकूण निर्यातीच्या ३५ टक्के निर्यात ही भारतातून होत असते. २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये अनुक्रमे ४२२ व ४४७.४७ बिलियन डॉलर किमतीचे मोलॅसिस भारतातून निर्यात करण्यात आले. निर्यातीस मोलॅसिसची मागणी असल्याने कारखान्यांना चांगला दर मिळतो. पण सध्याच्या परिस्थितीत इथेनॉल निर्मितीसाठी मोलॅसिसची गरज निर्माण झाल्याने शुल्क लावण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.