Crop Damage Compensation In Akola : सन २०२१ तसेच २०२२ मध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेती व फळ पिकांचे नुकसान झाले होते. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठवलेला प्रस्ताव वर्षभरापासून शासन दरबारी पडून होता.
अखेर वर्षभरानंतर शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४५ कोटी ९४ लाख ३२ हजारांची मदत जाहीर केली आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर २०२१, डिसेंबर २०२१ व मे २०२२ या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी झाली होती. या पावसाचा खरीप पिकांसह रब्बी व फळ पिकांना फटका बसला होता. या काळात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. परंतु कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या प्रस्तावांवर कार्यवाही प्रलंबित होती.
या प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून पुन्हा नव्याने प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यावर कार्यवाही करत राज्य शासनाने ऑक्टोबर २०२१, डिसेंबर २०२१ व मे २०२२ या महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची मदत ५ जून २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे जाहीर केली.
डिसेंबर २०२१ मध्ये जिल्ह्यातील १७ हजार १७३.९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी आता शासनाने १५ कोटी ४ लाख ९७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये जिल्ह्यात २९ हजार १६१.६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ३० कोटी ७७ लाख ९२ हजार, तर मे २०२२ मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ६३.५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या भरपाईसाठी शासनाने ११ लाख ४३ हजारांची मदत जाहीर केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.