Kolhapur Flood : महापुराने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला; ३३ टक्के पिकाचे नुकसान, आता मदतीची प्रतिक्षा?

Kolhapur River Flood : जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुराने पाच ते सहा लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Floodagrowon
Published on
Updated on

Kolhapur Flood Crop Damage : जुलै महिन्यात झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. राधानगरी ते शिरोळ तर चंदगड ते शाहूवाडी तालुक्यापर्यंत नदीलगत असलेल्या दोन किमीच्या अंतरावरील सर्वच पिके पाण्याखाली गेल्याने सुमारे ३२ हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली होती. दरम्यान पूर ओसरल्यानंतर शेती पिकाचे किती नुकसान झाले आहे याची दाहकता कोल्हापुरातील शेतकऱ्यांना जाणवत आहे.

पंचगंगा, भोगावती, दूधगंगा (काळम्मावाडी), कुंभी, कासारीसह सर्वच नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात पंधरा दिवसांहून अधिक काळ राहिलेल्या पिकांनी दम तोडला आहे. आतापर्यंत आठ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पूर ओसरेल तसे कुजलेल्या पिकांचे भयाण चित्र शेतकऱ्यांचे काळीज पिळवटून टाकणारे आहे. जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुराने पाच ते सहा लाख शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टर शेती पाण्याखाली होती. ज्या-ज्या ठिकाणांचा पूर ओसरला आहे त्या-त्या ठिकाणांचे पंचनामे गतीने केले जात आहेत. जिल्ह्यातील आठ हजार हेक्टरवरील ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामेही वेळेत पूर्ण केले जातील असे ते म्हणाले.

Kolhapur Flood
Kolhapur Keshavrao Bhosle Theater : केशवराव भोसले नाट्यगृहासह खासबाग मैदानाचे मंचही भीषण आगीत बेचिराख

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, पन्हाळा तालुक्यांत अतिवृष्टीने झोडपून काढले. त्यानंतर मुसळधार पावसाने जिल्हा व्यापला आणि शेतकऱ्यांसह नदीकाठच्या ग्रामस्थांची झोप उडाली.

पावसाचा जोर जसजसा वाढू लागला तसतसा इंचइंच पाण्याने नदीकाठ व्यापला. २०२१ मध्ये ज्यावेळी महापूर आला त्यावेळी जेवढे पाणी लोकवस्तीत शिरत होते, त्यापेक्षा यावर्षी अधिक गतीने पाणी पातळी वाढत राहिली. गेल्या महिन्यात २२ जुलैला पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली.

त्यासोबतच जिल्ह्यातील १० ते १२ हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली. ऊस, भातासह इतर पिके पुराच्या पाण्यात बुडाली. दरम्यान, २५ जुलैला धोका पातळी गाठली आणि २० ते २१ हजार हेक्टर पूर्णपणे पाण्याखाली गेली.

त्यानंतर ४७ फूट आठ इंचांपर्यंत पाणी पातळी दोन दिवस स्थिर राहिली. त्यानंतर पाणी इंचाइंचांने कमी होत आहे. मात्र, दहा ते पंधरा दिवस पाण्यात राहिलेला ऊस, भात तसेच जनावरांची वैरण पूर्णपणे कुजली आहे. पूर ओसरेल तशी दुर्गंधी वाढत आहे.

ज्या ठिकाणी पुराचे पाणी कमी झाले आहे अशा ठिकाणांचे आठ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा ठिकाणांचे पंचनामे केले जात आहेत. जिल्ह्यात उसासह भात, नाचणीसह इतर कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचा अक्षरश: चिखल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com