Nagar News : आदिवासी भागाच्या विकासासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेतून राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी भागात २ हजार ३९५ कुटुंबांना वीजपुरवठा दिला आहे. ‘महावितरण’ने १२ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
पंतप्रधान जनमन योजनेमध्ये समाजातील विशेष दुर्बल आदिवासी घटकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा, या साठी सुरू केलेल्या योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने केली जात आहे. केंद्र शासनाकडून घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्राने विद्युत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
आदिवासी समाजासाठी राज्यात विविध विभागांमार्फत १५ नोव्हेंबर २०२३ पासून कार्यवाही सुरू झाली. राज्यात विशेष दुर्बल आदिवासींपैकी सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसलेल्या २३९५ लाभार्थींना विद्युत पुरवठा करण्यात आला.
आदिम जमातींना घर, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, गॅस जोड आदी ११ प्राधान्य क्षेत्रांची सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे. कातकरी, कोलम, माडिया गोंड आदी आदिवासी जमातींच्या वस्त्यांमध्ये काम करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला.
‘महावितरण’ला चंद्रपूर, नांदेड, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ जिल्ह्यांत, तसेच वसई परिसरात वीजपुरवठा मिळाला नसलेल्या आदिम जमातींची २३९५ घरे आढळली. या घरांना वीजपुरवठा करतानाच योजनेच्या तरतुदीत बसणाऱ्या आणखी ७३ लाभार्थ्यांना रायगड जिल्ह्यात वीजपुरवठा करण्यात आला, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.