
Solapur News : टिपेश्वर अभयरण्यातून येडशी अभयारण्यात आलेला वाघ पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयाने २८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीने आदेश दिला होता. या आदेशास अनुसरून वाघाला पकडण्यासाठी आता फक्त १५ दिवसांची मुदत राहिली आहे.
मागील ५५ दिवसांत या वाघाने २८ पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. सोमवारपासून (ता. १७) ही वाघ पकडण्याची मोहीम पुन्हा तीव्र करण्यात येणार असून, ९ फेब्रुवारीचा प्रयत्न अपयशी ठरल्याने भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे औषध बदलण्यात येणार असल्याची माहिती धाराशीवचे विभागीय वनअधिकारी बी. ए. पौळ यांनी दिली.
येडशी येथील पाणवठ्यावरील ट्रॅप कॅमेऱ्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा वाघाचे छायाचित्र कैद झाले होते. अभयारण्याबाहेर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढल्यानंतर १० जानेवारी रोजी राज्य प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी वाघाला पकडण्याची परवानगी दिली. यावेळी हा आदेश २८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीने दिला होता. ही मुदत संपण्यासाठी आता पंधरा दिवसच शिल्लक राहिली असून अद्याप वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही.
नऊ फेब्रुवारीचा डाव फसला
वाघ पकडण्यासाठी सुरवातीला ताडोबा येथील १० जणांची अनुभवी रेस्क्यू टीम १३ जानेवारी रोजी रामलिंग अभयारण्यात दाखल झाली. या टीमने यापूर्वी ८२ वाघ पकडले होते. १४ जानेवारीपासून धाराशिव आणि सोलापूर वनविभागाच्या मदतीने या टीमने वाघ पकडण्याची मोहीम सुरू केली. या टीमने फक्त आठ दिवस वाघाचा शोध घेतला. या काळात दोन वेळा वाघ रेस्क्यू टीमच्या टप्प्यात आला होता, परंतु त्याच्यावर डार्ट गनचा वापर करता आला नाही.
दरम्यान याच काळात विदर्भात वाघांचे मृत्यू वाढल्यामुळे या टीमला २२ जानेवारीला परत पाठवण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारीपासून पुणे येथील आठ जणांच्या रेस्क्यू टीमकडे वाघ पकडण्याची जबाबदारी दिली. रविवारी (ता.९) रात्री डार्ट गनचा प्रयोग केल्यानंतर रेस्क्यू टीमने वाघाची शोध मोहीम थांबवली होती. आता रेस्क्यू टीम विभक्त करून दोन टीम केल्या जाणार असून, दोन्हींच्या प्रयत्नातून सोमवारपासून पुन्हा एकदा वाघाची शोध मोहीम सुरू करण्यात येत आहे.
रविवारी (ता.९) वाघ रेस्कू टीमच्या टप्यात आला होता. मात्र, डार्ट गनचा वापर करूनही वाघ बेशुद्ध पडलाच नाही. यामागील नेमके कारण वन विभागाला देता आले नसले तरी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वाघाच्या वजनाचा अंदाज न आल्याने औषधाची योग्य मात्रा वापरली गेली नसावी. अथवा प्रत्येक प्राण्याची शरीरप्रकृती वेगळी असल्याने भूली देण्याकरिता वापरण्यात आलेल्या औषधाचा वाघावर परिणाम झाला नसावा. यामुळे आता भूल देण्याचे औषध बदलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
वाघ दररोज जागा बदलतोय
बार्शी आणि धाराशिव सीमा भागातील गावांमध्ये पाळीव प्राण्यांवरती हल्ला करून दहशत माजविणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, वाघ दररोज भाग बदलत हल्ले करीत असल्यामुळे रेस्कू टीमसमोर आव्हान निर्माण झाले आहे. वाघ वारंवार या टीमला चकवा देत असल्यामुळे वाघ हाती लागत नाही. वाघ तीनवेळा टप्प्यात आला, परंतु हाती लागला नाही. यासाठी आता एका पथकाचे दोन विभाग केले असून सोमवारपासून पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.