Sindhudurg News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेने १ हजार ५१२ टन खत जिल्ह्यातील झाराप येथे उतरविण्यात आले आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध झाल्यामुळे या वर्षी खताचा तुटवडा भासणार नाही अशी शक्यता आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वेतून खत वाहतुकीचा निर्णय घेतला होता.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी खत, बियाणे उपलब्ध व्हायला हवीत अशी सूचना आढावा सभेत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केली होती. खत पुरवठा वेळेत व्हावा या विषयावर चर्चा करताना अनेक समस्या पुढे आल्या होत्या.
या वेळी रेल्वेने खतपुरवठा झाला तर वेळेचा अपव्यय टाळून शेतकऱ्यांना हंगामापूर्वी खत मिळेल अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मांडली होती. त्यानुसार मंत्री श्री. चव्हाण यांनी तातडीने रेल्वे खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू केला.
जिल्ह्यातील झाराप रेल्वे स्थानकानजीक खत उतरविण्यासाठी जागेची पाहणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (ता. १२) मालगाडीने १ हजार ५१२ टन खत झाराप येथे उतरविण्यात आले. बँकेचे अध्यक्ष श्री. दळवी यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी तेथे उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रथमच रेल्वेने खत आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खत आल्यामुळे या वर्षी खताचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यातील तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.