Sugarcane Production Kolhapur : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला राज्यातील गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यात ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाचा (ता. २७) सरासरी साखर उतारा हा १०.१७ टक्के इतका आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत हाच उतारा हा ९.९७ टक्के होता. दरम्यान, उसाचा किमान आधारभूत दर हा साखरेच्या उताऱ्यानुसार निश्चित होत असल्याने उतारा सर्वाधिक असलेल्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाचा दर वाढण्यास मदत होणार आहे.
राज्यात सर्वाधिक ११.५ टक्के इतका सरासरी साखर उतारा हा कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा आहे. त्यामुळे यंदा या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळू शकणार आहे. सरासरी साखर उताऱ्याच्या टक्केवारीत नांदेड विभाग दुसऱ्या, तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यात सर्वांत कमी साखर उतारा हा नागपूर विभागातील कारखान्यांचा असून, तो केवळ ५.८१ टक्के इतका अल्प आहे. त्यामुळे या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी दर मिळू शकणार आहे. या वृत्तास राज्याच्या साखर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. साखर कारखान्यांचे राज्यात एकूण आठ विभाग असून सर्व विभागांतील मिळून २०७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे.
आंदोलनाचा परिणाम उसावर झाला का?
महाराष्ट्रातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू झाले परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या मुद्दावरून साखर कारखाने बंद पाडले तब्बल ३ आठवड्यांनी साखर कारखाने तोडगा निघाल्यावर सुरू झाले.
परंतु याचा परिणाम ऊस उत्पादन घटीवर होईल असे वर्तवले जात होते परंतु साखरेचा उतारा आणि उत्पादनात राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिल्याने ऊस आंदोलनाचा फारसा उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.