
Jalna News : शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मोसंबीचे व्यवस्थापन करून हवामान बदलावर मात करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे (Fruit Research Center) प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी केले.
‘बदलत्या हवामानात मोसंबी पिकाचे व्यवस्थापन’ या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या वतीने रविवारी (ता. ५) आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या ३०६ व्या मासिक चर्चासत्रात डॉ. पाटील बोलत होते.
या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजय अण्णा बोराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, निवृत्त सहआयुक्त (जीएसटी) डॉ. नीलकंठ डाके, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जी. टी. राऊत, सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रीमती ए. आर. जोगदंड यांची उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले, की सध्याच्या बदलत्या हवामानात (Change Weather) मोसंबीची फळगळ, फळांवर काळे चट्टे पडणे, फळमाशी आणि फळांतील रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव, डिंक्या व डायबॅक, सिट्रस ग्रीनिंग या मोसंबीतील प्रमुख समस्या आहेत.
माती परीक्षण केल्याशिवाय मोसंबी लावू नये. दहा टक्क्यांपेक्षा अधिक चुनखडी असल्यास अशा जमिनीत मोसंबी लावू नये. शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोसंबीची बाग विक्री करताना चार पाण्यावर मोसंबीची बाग देण्याची पद्धत बंद करावी.
मोसंबीत इतर आंतरपिके घेण्याचे टाळावे. कोळी किडीच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग निर्माण होतात. फळमाशी आणि फळांतील रस शोषण करणारा पतंग या दोन वेगळ्या किडी असून, त्यानुसार उपाययोजना कराव्यात. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजयआण्णा बोराडे यांनी मोसंबी लागवड करण्यापूर्वी शास्त्रज्ञांकडून आर्किटेक्ट प्रमाणे प्लॅन घ्यावा व मगच लागवड करावी असे सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.