
सुदर्शन सुतार ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur Pomegranate Production : पिनहोल बोरर, शॉटहोल बोरर, तेल्या आणि मरसारख्या रोगांचा सततचा प्रभाव रोखण्यात शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आल्याने देशभरातील डाळिंब शेती (Pomegranate Farming ) धोक्यात आली आहे.
परिणामी, नव्याने डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात (Pomegranate Production land) घट होण्याबरोबरच आता माग णी असूनही केवळ मागणीच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा पुरवठा होऊ शकत नसल्याने निर्यातीलाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५० टक्क्यांनी निर्यात घटली आहे.
जगभरातील आघाडीवरचा डाळिंब देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतात सर्वाधिक दोन लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारताचा डाळिंबाच्या निर्यातीतला हिस्साही मोठा आहे.
जगभरातील ३० हून अधिक देशात भारतीय डाळिंबाची निर्यात होते. स्पेन, इराण, टर्की, इजिप्त हे काही देश भारताचे डाळिंब उत्पादनातील स्पर्धक आहेत.
पण तरीही जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. त्यात युरोपसह अरब अमिराती, कतार, नेदरलँड आणि बांगलादेश या बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत.
युरोपमध्ये रेसिड्यू फ्री डाळिंबाला उठाव आहे. त्यात भारताच्या भगव्या डाळिंबाला चांगली पसंती मिळते, पण गेल्या दोन-तीन वर्षांत भारतात डाळिंबावरील कीड-रोगांवर सततच्या फवारण्यांमुळे रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादन शक्य होत नाही, परिणामी, या बाजारपेठेतून मागणी असूनही भारत ती पूर्ण करू शकत नाही.
त्यामुळे दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबाला उठाव असणाऱ्या बांगलादेश आणि अरब अमिराती या देशांकडे भारताची डाळिंब सध्या वळली आहेत. पण आता या बाजाराकडूनही कमी उठाव मिळतो आहे. शिवाय डाळिंबाची उपलब्धता नसल्याने पुरवठाही होऊ शकत नाही.
त्यामुळे भारतातील एकूण निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. यंदा फेब्रुवारीअखेर डाळिंबाची निर्यात केवळ ५१ हजार ७४६ टन इतकीच होऊ शकली. गेल्या वर्षी हीच निर्यात ९९ हजार ४३ टनांवर होती. सुमारे ५० टक्क्यांनी निर्यातीत घट झाली आहे.
तसेच आता अलीकडे मार्च आणि एप्रिलमध्ये युरोपीय बाजार जवळपास बंद झाल्याचे आणि आता फक्त बांगलादेशला निर्यात होत असल्याचे सांगण्यात आले. सध्या तिथे प्रतिकिलोला सर्वाधिक १२० रुपये इतका दर मिळत आहे.
नव्याने डाळिंब लागवड घटली
देशात डाळिंबाचे एकूण क्षेत्र २ लाख ६६ हजार हेक्टर आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक दीड लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. डाळिंबाच्या उत्पादनासह निर्यातीतही महाराष्ट्राचीच आघाडी आहे. एकूण निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते.
पण गेल्या दोन-तीन वर्षांत सततच्या कीड-रोगाच्या प्रादुर्भावामुळे जुन्या बागांपैकी ४० टक्के बागा आता संपुष्ठात आल्या आहेत. तर दुसरीकडे नव्याने डाळिंबाची लागवडही घटत चालली आहे.
निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी
गेल्या तीन वर्षांचा विचार करता २०२०-२१ मध्ये डाळिंबाची एकूण निर्यात ६७ हजार ९७६ टन झाली, त्यात महाराष्ट्राचा सर्वाधिक ५५ हजार ४२३ टनांचा वाटा राहिला.
गेल्यावर्षी २०२१-२२ मध्ये ९९ हजार ४३ टन निर्यात झाली. त्यात ८३ हजार २७६ टनांपर्यंत महाराष्ट्रातून निर्यात झाली, तर यंदा २०२३ मध्ये (फेब्रुवारीपर्यंत) ५१ हजार ७४६ टन इतकी निर्यात झाली. त्यात सर्वाधिक ४२ हजार ३६६ वाटा महाराष्ट्राचा राहिला आहे.
डाळिंबाच्या गुणवत्तेला आणि रेसिड्यू फ्री डाळिंबाला युरोपीय बाजारात मागणी आहे. आपल्या डाळिंबाला मोठा वाव आहे.
पण आपल्याकडून तेवढ्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच निर्यातीत घट होते आहे.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, पुणे
डाळिंबाची क्षेत्रवाढ घटली आहे, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण आता केवळ मागणी असूनही आपण डाळिंबाचा पुरवठा करू शकत नाही, ही त्याहूनही अधिक चिंतेची बाब आहे.
कीड-रोगांवरील नियंत्रण आणि नव्याने आकारमान, वजन, रंग या गुणवैशिष्ट्यांसह रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या नव्या डाळिंब वाणाची अधिक आवश्यकता आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ, पुणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.