
Nanded News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) हे विकास कामांबद्दल बोलत नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या (Farmers Right) लढ्यात खोडा घालू नका. शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान (Subsidy), २४ तास मोफत वीज, पाणी द्या.
मी महाराष्ट्रात येण्याचे बंद करतो, असे आव्हान ‘बीआरएस’चे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) (केसीआर) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
केसीआर यांची रविवारी (ता. २६) लोहा येथे पक्ष प्रवेश व जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. ‘तुमचे काम तेलंगणमध्ये, इथे कशासाठी आलात, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी त्यांना मला प्रतिबंध करता येणार नाही.
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने महाराष्ट्रात तांत्रिक मान्यता घेतली आहे. या पक्षाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून महाराष्ट्रात पाय घट्ट रोवले जातील.
तेलंगणाच्या धर्तीवर या राज्यात विकासकामे केली जातील. देशात अनेक पंतप्रधान, मुख्यमंत्री सत्तेवर येतात आणि जातात, सत्ता बदल होतो, पण आमच्या समस्या मात्र कायम असतात. यापुढे गावपातळीपासून बुद्धिजीवी लोकांनी पुढे येऊन चर्चा करावी, निर्णय घ्यावा. महाराष्ट्रात धनाची कमी नाही, पण मनाची कमी आहे.
आम्ही आमच्या हक्काचे पाणी, नैसर्गिक साधन संपत्ती जपायला सांगतोय. ७५ वर्षांपासून देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तशाच आहेत. महेंद्रसिंग टिकैत यांच्यापासून शरद जोशींपर्यंतच्या नेत्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढे दिले.
यापुढे शेतकऱ्यांनी एकत्र राहावे. जात आणि धर्माच्या नावावर कोणी देश विकायला काढला असेल तर तो वेळीच ओळखावा, असे राव म्हणाले.
शेतकरी एकजूट हाच आमचा मंत्र आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले.
यावर ते म्हणाले, की सहा हजारांनी काय होते. येथील शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये, मोफत वीज, पाणी द्या, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांपासून निवडणुका लढायला सुरुवात करणार आहोत.
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील ८० सरपंचांनी एकत्र येऊन शासनाला घाबरवून सोडले, तेव्हा कुठे सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाणावर आले, असे सांगत राव यांनी शेतकरी एकजुटीचा नारा दिला.
यावेळी पंजाबमधील शेतकरी नेते गुरुनाथसिंग चढ्ढा, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, प्रा. यशपाल भिंगे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सुरेश गायकवाड, नागनाथ घिसेवाड, जाकेर चाऊस, दत्ता पवार, संतोष गव्हाणे, धनंजय काकडे, डॉ. सुनील धोंडगे, शिवराज धोंडगे, दिलीप धोंडगे, केलास येसगे आदींनी ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश केला.
‘केसीआर’ हे भविष्यातील पंतप्रधान : धोंडगे
शेतकरी, शेतीसाठीच आपण ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करत असल्याचे सांगून माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी ‘केसीआर’ हे भविष्यातील पंतप्रधान असल्याचे सांगितले. धर्म, जातीच्या नावावर देशात दुफळी झाली. शेतकरी, गरिबांची स्थिती अधिक बिकट बनली. यापुढे शेतकरी, शेतमजूर, गरीब, मागास घटकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.