सोलापूर ः वीजचोरी करणाऱ्या वीज (Electricity) ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली असून, गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये १९८ वीजचोरांना दणका देत सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवले आहे, यात सर्वाधिक १० वीजचोऱ्या एकट्या ठाण्यातील आहेत.
महावितरणने त्यासाठी खास मोहीम उघडली आहे. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करून येणाऱ्या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार केली असावी, असा संशय आल्याने महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली.
गेल्या तीन दिवसांत या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीजबिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.
मीटरमध्ये केला फेरफार
या पथकाने सर्व मीटरची तपासणी केली असता जवळपास १९८ वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. एकट्या कोकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मूल्यांकन केले असता, येथील वीजग्राहकांनी एकूण ७ लाख ४४ हजार ११४ युनिटचा अनधिकृतपणे वापर केल्याचे निदर्शनास आले. या वीजचोरीची अनुमानित रक्कम १ कोटी २२ लाख रुपये असून, या ग्राहकांना आता वीजचोरीचे देयक देण्यात आले आहे. उर्वरित पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रांत पकडण्यात आलेल्या वीजचोरीच्या मूल्यांकनांची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.