Rural Dairy Entrepreneurship Success: अहिल्यानगर जिल्ह्यातील केळवंडी (ता. पाथर्डी) येथील रूपाली व दीपक या शेटे दांपत्याने काही वर्षांपूर्वी गोपालन व त्यानंतर सहा म्हशींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. बघता बघता म्हशींची संख्या २५ च्या वर गेली. गीर गाईंचे पालनही सुरू केले. दूध वाढले तसे थेट विक्रीचे आऊटलेट सुरू केले. प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती सुरू केली. आज मुख्य जबाबदारी रूपाली सांभाळत असून, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीच्या बळावर व उत्पन्नस्रोतांचे अन्य मार्ग शोधून व्यवसायात भरभराट व आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. .अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाथर्डी तालुक्याचा बहुतांश भाग दुष्काळी आहे. याच पाथर्डी येथे शेटे कुटुंब राहते. कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती कोंडिराम निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. पाथर्डी आणि तेथून काहीच किलोमीटरवरील सिरसाटवाडी शिवारात कुटुंबाची १४ एकर शेती आहे. कोंडिराम यांचे चिरंजीव दीपक अभियंता असून, पुणे जिल्ह्यात शिक्रापूर येथे खासगी कंपनीत नोकरी करतात. वेळेनुसार ते घर व शेतीची जबाबदारी पाहतात. कुटुंबाचा दुग्ध व्यवसायही आहे. त्याची मुख्य जबाबदारी दीपक यांची पत्नी रूपाली पाहतात. त्यांनी ‘बीसीएस’ची पदवी घेतली आहे. या दांपत्याला अथर्व, आकांक्षा व आर्या अशी मुले आहेत. पैकी आकांक्षा सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. दीपक यांचे वडील कोंडिराम व आई अंजनाबाई यांची देखील शेतीत मोठी मदत होते..Dairy Business Success: वयाच्या सत्तरीतही दुग्ध व्यवसायातील उत्साह.व्यवसाय स्थैर्याकडेनोकरी सुरू असताना दीपक यांना कोल्हापूर जिल्ह्यातील मित्राने शेतीला पूरक म्हणून गोपालन करण्याचा सल्ला दिला. सन २०१२ मध्ये सहा संकरित गाई (एचएफ) घेऊन व्यवसाय सुरू केला. गाईंच्या संख्येत टप्प्याटप्प्याने ४८ पर्यंत वाढ झाली. दररोज ३२५ लिटरपर्यंत संकलन व्हायचे. सुमारे चार वर्षांचा कालावधी गेला. पुढे दुधाच्या दरातील चढ-उतार, पशुखाद्याचे वाढलेले दर, दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई अशा अनेक समस्या उभ्या राहिल्या. त्यामुळे हा व्यवसाय बंद करावा लागला. पुढे समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला. गाईंऐवजी म्हैसपालनावर भर दिला. सहा म्हशींपासून पुन्हा एकदा व्यवसायाला सुरुवात झाली. गुजरातमधील ब्रीडचा वापर केला. व्यवस्थापनात सुधारणा, कुटुंबातील सदस्यांचा समन्वय या बळावर व्यवसाय स्थैर्याकडे झुकला. दीर्घकाळ जपलेल्या सातत्यातून आजमितीला २८ म्हशी, २० कालवडी, ११ गीर गाई व १० वासरे असे पशुधन गोठ्यात आहे..खाद्यसुरक्षा जपलीदररोज दोन वेळा म्हशी धुण्यात येतात. पचनाला सोपा जावा आणि दुधात वाढ व्हावी यासाठी खुराक भिजवून दिला जातो. पाच एकरांत चारा पिके घेतली जातात. यात मका, गिन्नी गवत आदींचा समावेश असते. उन्हाळ्यात प्रामुख्याने सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गव्हाणी चोवीस तास पाण्याने भरलेल्या असताता. दुष्काळी पट्टा असल्याने चाराटंचाईला सातत्याने सामोरे जावे लागते. तो विचार करून चाऱ्याचे काटेकोर नियोजन केले जाते. दरवर्षी सुमारे २५ टन मुरघास व १५ ते २० टन गव्हाचा भुस्सा तसेच गरजेनुसार उसाची खरेदी करण्यात येते..Dairy Business: पाटील बंधूंचा नावारूपाला आलेला श्री डेअरी फार्म .थेट विक्री व्यवस्थाशेटे यांनी दहा वर्षांपूर्वी दुधाची थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर दिला. सुरुवातीच्या काळात त्यात अनेक अडचणी आल्या. मात्र चिकाटी काही सोडली नाही. दर्जेदार दुधाबाबत ग्राहकांचा विश्वास संपादन केला. म्हशीच्या दुधाबरोबर देशी गीर गाईंच्या दुधालाही मागणी होऊ लागली. त्यातूनच गीर गोसंगंपनोला चालना मिळाली. आज पाथर्डीपासून सुमारे चार किलोमीटरवरील माणिकदौंडी रस्त्यावर थेट विक्रीचे आउटलेट सुरू केले आहे. घरच्या गोठ्यातील रोजचे एकूण दूध उत्पादन २५० ते २७५ लिटरच्या दरम्यान आहे. सर्व विक्री या आऊटलेटमधून होते. प्रति लिटर ८० रुपये दर आहे. विक्री केंद्र स्वतः रूपालीच पाहतात. केवळ दूध विक्री करून उत्पन्न वाढणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. .त्यातूनच प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती गरजेची वाटू लागली. मग परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलनाला सुरुवात झाली. त्यापासून पनीर, दही ताक यांचे दररोज तर मागणीनुसार तुपाची निर्मिती सुरू केली. सध्या दररोज ४५ ते ५० किलो पनीर, ३० ते ४० किलो दही, १५ ते २० लिटर ताक तर महिन्याला ८० किलोपर्यंत तुपाची विक्री होते. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी यंत्रे व साहित्य खरेदी केले आहे. उन्हाळा, लग्नसराई, दसरा, दिवाळी, गौरी गणपती, नवरात्र उत्सव काळात या पदार्थांना अधिक मागणी असते. पनीर विक्रीसाठी स्वतंत्र आउटलेट सुरू केले आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा स्रोत अजून वाढविण्यासाठी अमूल कंपनीच्या उत्पादनांचे पार्लरही सुरू केले आहे..शेणखतातून उत्पन्नदरवर्षी १०० ते १२५ ट्रॉली खत मिळते. स्वतःच्या शेतात वापरून उर्वरित खताची साडेतीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री होते. शेणखताच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे. शिवाय दर्जेदार चारा उत्पादित होत आहे. शेणापासून गांडूळ खत केल्यास अधिक नफा मिळत असल्याने येत्या काळात त्याची निर्मिती केली जाणार आहे..व्यवसायातून प्रगतीआपल्या दुग्ध व्यवसायातून शेटे कुटुंबाने सात स्थानिकांना रोजगार दिला आहे. पैकी काही जण गोठ्यात तर काही प्रक्रिया व्यवसायात काम करतात. गोठ्यानजीक राहण्याची व्यवस्थाही केली आहे. रूपाली सांगतात, की याच व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली. मुलांना चांगले शिक्षण देता आले. तीन आउटलेट्स तयार करता आली. येत्या काळात व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे..वयाच्या पंचाऐंशीतही सक्रियशेट कुटुंबाचे १० एकर क्षेत्र ज्या ठिकाणी आहे तो डोंगराळ परिसर असून पाण्याचे कायम दुर्भिक्ष असते. भागात असलेल्या छोट्या तलावामुळे विहीर, विंधन विहिरीला पाणी उपलब्ध असते. तेथेच म्हशींचा गोठा आहे. दीपक यांचे आई- वडील दिवसभर येथे थांबून देखरेख करतात. वयाची ८५ वर्षे ओलांडलेले कोंडिराम दिवसभर शेतात रमतात. दररोज सकाळी चालण्याचा व्यायाम करतात. त्यांची तब्येत अगदी ठणठणीत असून चेहऱ्यावरही समाधान असते.दीपक शेटे ७७७४०००३८५, ९०२२७९५०९४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.