सुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या पाटील पितापुत्रांनी मिरची पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून प्रतिकूल स्थितीत दर्जेदार व एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यामध्ये हातखंडा तयार केला आहे. अलीकडील दोन वर्षांत ३५ ते ५० टनांपर्यंत मिरचीची आखातात निर्यात करण्यात ते यशस्वी झाले आहेत. ओल्या लाल मिरचीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून देशभरात नंदुरबारने ओळख तयार केली आहे. सुजालपूर (ता.नंदुरबार) शिवारही पपईपाठोपाठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. नंदुरबारपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर तापी नदीकाठी हा परिसर आहे. येथील अशोक बुद्धर पाटील व पुत्र प्रवीण यांची १० एकर शेती आहे. नदीकाठी शिवार असले तरी भूगर्भात जलसाठे पुरेसे नाहीत. पाणी गुणवत्तापूर्ण नाही. एक कूपनलिका आहे. परंतु तापी नदीवरून जलवाहिनी करून घेतली आहे. प्रकाशा (ता.शहादा) येथील तापी नदीवरील बॅरेजचा लाभ गावातील शिवारास होऊ लागला आहे. पाटील यांची शेती पाटील यांची जमीन हलकी व मध्यम प्रकारची आहे. अशोक हे पूर्णवेळ शेतीत असून प्रवीण नंदूरबार येथे राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून व सुट्ट्यांमध्ये तेही शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. मिरची हे पाटील यांचे मुख्य पीक आहे. अशोक यांना अनेक वर्षांपासून या पिकाचा अनुभव असला तरी अलीकडील काळात तंत्रज्ञान, व्यवस्थापन व वाण सुधार करून ते या पिकाची निर्यातक्षम शेती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मिरचीचे सुधारित व्यवस्थापन असे
वाणाचा वापर अलीकडील काळात लांबट, हिरव्या वाणाची लागवड करू लागले आहेत. पाटील म्हणाले की हिरवी मिरची विकायची तर या वाणाची निवड योग्य ठरते. थोडी तिखट, लांबट आहे. लांब वाहतुकीस चालते. आखातात व हॉटेल व्यवसायातून मागणी असते. या वाणाला नोव्हेंबरपर्यंत आखातात मागणी असते. त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत विकली जाते. निर्यातक्षम उत्पादन, उत्पन्न पाटील सांगतात की जूनमध्ये लागवड केलेल्या मिरचीचा प्लॉट एप्रिलपर्यंत चालतो. एकरी सुमारे ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते. एकरी खर्च सुमारे दोन लाख रुपये येतो. यंदा एकूण चार लाख रुपये उत्पन्न साध्य झाले. गेल्या वर्षी दर कमी असल्याने उत्पन्न यापेक्षा कमी होते. जेवढे एकूण उत्पन्न हाती आले त्यातील खर्च वजा करून ५० ते ६० टक्के निव्वळ नफा मिळाला. विक्री व निर्यात मागील वर्षी सुमारे ३५ टन मिरची योगेशभाई पटेल यांच्या सहकार्यातून आखातात पाठवली. यंदा ५० टनांपर्यंत निर्यात झाली आहे. काही कालावधीसाठी किलोला ८० ते ८५ रुपये दर मिळाला. मात्र सरासरी दर २० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत मिळतो. निर्यातक्षम दर्जा असल्याने जागेवरून गुजरातमधील निझर (जि.तापी) येथील खरेदीदार उचल करतात. मिरचीची आवक अधिक झाली तर बाजारात दबाव असतो. बाजार अनेकदा अस्थिर असतो. परंतु गेले दोन वर्षे दर टिकून राहिल्याचा लाभ झाला आहे. लागवडीपासून खर्चाचे गणित बसवावे लागते. त्यासाठी गुंतवणूक करण्याचे धाडस पाटील यांनी केले. मिरचीचे चांगले उत्पादन देणाऱ्या वाणाची रोपे नाशिक जिल्ह्यातून ते दीड रुपये प्रतिरोप दराने खरेदी करतात. पाच एकरांत ३० हजार रोपांची गरज भासते. काढणी लागवडीनंतर सुमारे ५० दिवसांत सुरू होते. काढणीसाठी प्रति किलो किमान चार रुपये खर्च येतो. संपर्क-प्रवीण पाटील- ९०११४७१८१८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.