चांदोर (ता. जि. रत्नागिरी) येथील दत्ताराम राघो तांबे यांनी कातळावर फुलवलेल्या जुन्या कलमांचे पुनरुज्जीवन केले आहे. योग्य व्यवस्थापन करून झाडांची सुनियोजित वाढ करून प्रति झाड उत्पादन व फळाचा आकार वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याची देखील देवगड आंब्यासारखी वेगळी ओळख आहे. याच जिल्ह्यातील चांदोर येथील दत्ताराम राघो तांबे यांची आंब्याची बाग आहे. मुंबईतील नोकरी सोडून गावी आपल्या शेतीत ते रमले आहेत. त्यांचे किराणा मालाचेही दुकान आहे. वडिलोपार्जित जमिनीत सुरुवातीला त्यांनी तीनशे आंबा कलमे लावली. त्यानंतर हळूहळू वाढ करत करत आज संख्या तीन हजार झाडांपर्यंत पोहोचली आहे. बहुतांश हापूस तर काही झाडे केसर आंब्याची आहेत. छाटणीचा कार्यक्रम तांबे यांच्या बागेत २५ वर्षांपासूनची ते ४० वर्षांपूर्वीची झाडे आहेत. साहजिकच उंची खूप असल्याने आंबा काढताना अनेक अडचणी येत होत्या. त्यांचे ‘कॅनोपी’ व्यवस्थापन करणे गरजेचे होते. उत्पादन कमी येत होते. फळांचा आकार लहान राहायचा. यावर उपाययोजना म्हणून झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. असे व्यवस्थापन केलेल्या विविध बागांची पाहणी केली. काही सल्लागार तसेच राजापूर येथील राजू पावसकर, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी सहायक नागनाथ साखरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रारंभी शंभर ते त्यापुढील कलमांची निवड केली. असा राबवला कार्यक्रम
जिवामृताचा वापर छाटणी केलेल्या कलमांना प्रति झाड आठवड्यातून दोन लिटर जिवामृताचा वापर होतो. त्यासाठी चार कामगार नियमित बागेत कार्यरत असतात. जिवामृत बनविण्यासाठी दहा देशी गायी पाळल्या आहेत. शेण, गूळ, बेसन, वडाच्या झाडाखालची माती आदींचा वापर करून जिवामृत बनवले जाते. महिन्याला सुमारे ६०० लिटरहून अधिक निर्मिती होते. आश्वासक निष्कर्ष तांबे सांगतात, की छाटणी कार्यक्रम झाल्यानंतर साधारण दोन वर्षांनंतर फळ येण्यास सुरुवात होते. मागील वर्षी प्रति झाड फळांची संख्या वाढली. प्रति झाड १० पेटी (प्रति १६ ते १७ किलो) उत्पादन पूर्वी यायचे. ते पाच पेट्यांनी वाढले. फळांचा आकारही वाढला आहे. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत आहे. यंदा सगळीकडेच आंबा कमी आहे. मात्र बागेत स्थिती समाधानकारक आहे. विक्री मुंबई, पुणे, नाशिक, वाशी, अहमदाबाद येथे दरवर्षी आंबा विक्रीस जातो. पाच डझन ते आठ डझनांपर्यंतची पेटी असते. मोठ्या फळांचा दर जास्त मिळतो. सरासरी दर एक हजार, १५०० ते २००० रुपये प्रति पेटी मिळतो. हंगामाच्या सुरुवातीला तो ५००० ते ६००० रुपये मिळतो. नारळासह भाजीपाल्याची लागवड तांबे यांनी अन्य पिकांची शेतीही वाढवली आहे. नारळाची ८० झाडे आहेत. स्वतःचेच दुकान असल्याने त्याद्वारे वर्षाला सरासरी ८० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. प्रति नारळ सरासरी २५ रुपयांपर्यंत विकला जातो. घरगुती वापरासह गावातच विक्रीसाठी वाल, पावटे, पालेभाज्यांचीही लागवड होते. काठ्या उभ्या करून त्यावर पावट्याचा वेल सोडला आहे. जिवामृताधारे वालाचे उत्पादन चांगले मिळाले आहे. पुरस्काराने सन्मान कृषी विभागाकडून आंब्यासाठी पॅकहाउस, यांत्रिकीकरणातून पॉवर टिलर व ग्रासकटर, आंबा पुनरुज्जीवन योजनेतून छाटणीसाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. तांबे यांचा उत्कृष्ट शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानही करण्यात आला आहे. संपर्क- दत्ताराम तांबे, ९३२५५६६२८७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.