डॉ. सचिन मांडवगणे, डॉ. सौ अनुपमा कुमारPomegranate Processing: ग्रीन बायोरिफायनरीची संकल्पना एका उत्पादनावर थांबत नाही. डाळिंबाच्या सालीतील प्रत्येक घटकाचा टप्प्याटप्प्याने उपयोग करून त्यातून अधिकाधिक मूल्य निर्माण करणे, हा तिचा मूलभूत सिद्धांत आहे. प्रथम उच्च मूल्याची जैवसक्रिय संयुगे मिळवली जातात. त्यानंतर उरलेल्या जैवभारातून आहारातील तंतू, पशुखाद्य, जैवखते, जैवऊर्जा किंवा इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात..देशातील डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. ज्यूस, सिरप आणि इतर प्रक्रिया उद्योगांमुळे डाळिंबाला मोठी बाजारपेठ मिळाली असली, तरी या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर साल, बिया आणि पल्प अवशेष म्हणून उरतात. विशेष म्हणजे डाळिंबाच्या एकूण वजनापैकी जवळपास निम्मा भाग सालीचा असतो. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर हा जैवअवशेष निर्माण होतो.आजही अनेक ठिकाणी या सालीची विल्हेवाट लावणे ही समस्या मानली जाते. परंतु ग्रीन बायोरिफायनरीच्या दृष्टीने ही साल कचरा नसून मूल्यवान जैवसंपत्ती आहे. योग्य तंत्रज्ञानाच्या साह्याने तिच्यापासून अँटिऑक्सिडंट्स, आरोग्यपूरक घटक आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात..Potato Processing: बटाटा बायोरिफायनरी : टाकाऊ सालीपासून मूल्यवर्धित उत्पादने.सालीत दडलेली संपत्तीकोणत्याही बायोरिफायनरीचे यश कच्च्या मालाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. डाळिंबाच्या बाबतीत हा कच्चा माल म्हणजे त्याची साल. प्रक्रिया उद्योगांमध्ये ज्यूस, सिरप किंवा इतर उत्पादनांच्या निर्मितीदरम्यान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारी ही साल अनेक मौल्यवान जैवसक्रिय संयुगांचा नैसर्गिक साठा आहे. डाळिंबाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल्स, प्युनीकॅलॅजिन आणि एलॅजिक आम्ल यांसारखी संयुगे आढळतात. वनस्पतीच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या नैसर्गिक संयुगांमध्ये उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट क्षमता असल्यामुळे त्यांना आरोग्यपूरक उत्पादने, न्यूट्रास्युटिकल्स आणि नैसर्गिक अन्नघटकांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे..विशेषतः प्युनीकॅलॅजिन आणि एलॅजिक आम्ल या संयुगांवरील संशोधनामुळे डाळिंबाच्या सालीकडे उच्च मूल्याच्या जैवउद्योगासाठी कच्चा माल म्हणून पाहिले जात आहे. ग्रीन बायोरिफायनरीच्या दृष्टीने पाहिले तर डाळिंबाची साल म्हणजे अनेक उत्पादनांची सुरुवात आहे. जशी ऊस हा साखर उद्योगाचा कच्चा माल आहे, त्याचप्रमाणे डाळिंबाची साल ही अँटिऑक्सिडंट आधारित बायोरिफायनरीची आधारभूत जैवसंपत्ती आहे. मात्र या मौल्यवान घटकांचा उपयोग होण्यासाठी ते सालीतून योग्य पद्धतीने बाहेर काढावे लागतात. हीच प्रक्रिया म्हणजे बायोरिफायनरीतील पुढची आणि सर्वांत महत्त्वाची पायरी होय..अँटिऑक्सिडंट्सचा शोधडाळिंबाच्या सालीतील मौल्यवान जैवसक्रिय संयुगे थेट वापरता येत नाहीत. ती सालीच्या पेशींमध्ये बंदिस्त असतात. त्यामुळे बायोरिफायनरीतील पुढील महत्त्वाची पायरी म्हणजे ही संयुगे कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने बाहेर काढणे. या प्रक्रियेला हरित निष्कर्षण असे म्हणतात. पूर्वी अशा निष्कर्षणासाठी रासायनिक विद्रावकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. मात्र आज कमी रसायने, कमी ऊर्जा आणि अधिक कार्यक्षमता यांवर आधारित हरित तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जाते. हीच ग्रीन बायोरिफायनरीची मूलभूत संकल्पना आहे..या प्रक्रियेची सुरुवात सालीची स्वच्छता, वाळवणे आणि पूड तयार करण्यापासून होते. त्यानंतर योग्य माध्यमाच्या साहाय्याने सालीतील अँटिऑक्सिडंट्स आणि इतर जैवसक्रिय संयुगे अर्काच्या स्वरूपात बाहेर काढली जातात. ही प्रक्रिया चहाच्या पानांमधील रंग आणि स्वाद गरम पाण्यात उतरविण्यासारखी असली, तरी येथे उद्देश सालीत दडलेली मौल्यवान नैसर्गिक संयुगे पुनर्प्राप्त करण्याचा असतो.मात्र या अर्कामध्ये अनेक प्रकारची जैवसक्रिय संयुगे एकत्र असतात. त्यापैकी अधिक मौल्यवान आणि आवश्यक संयुगांची निवडक पुनर्प्राप्ती करणे ही बायोरिफायनरीतील पुढील आणि अधिक प्रगत पायरी आहे..Farming Success Story: सर्जेरावबापूंची पेरणी गुंठ्यात, हिशेब मात्र लाखमोलाचा !!.अचूक शुद्धीकरणहरित निष्कर्षणानंतर मिळणारा अर्क हा अनेक जैवसक्रिय संयुगांचे मिश्रण असतो. मात्र सर्वच संयुगांचे औद्योगिक मूल्य समान नसते. त्यामुळे बायोरिफायनरीतील पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे या मिश्रणातून आवश्यक आणि अधिक मूल्यवान संयुगाची निवडक पुनर्प्राप्ती करणे. यासाठी मॉलिक्युलर इम्प्रिंटेड पॉलिमर्स हे अभिनव तंत्रज्ञान वापरले जाते. हे विशेष पॉलिमर्स विशिष्ट रेणूसाठी तयार केलेल्या कुलूपाप्रमाणे कार्य करतात. जशी विशिष्ट कुलूपात विशिष्ट चावीच बसते, त्याचप्रमाणे या पॉलिमर्समध्ये अपेक्षित रेणूच अचूकपणे अडकतो, तर इतर संयुगे वेगळी होतात. .त्यामुळे एलॅजिक आम्लासारख्या उच्च मूल्याच्या जैवसक्रिय संयुगांची निवडक पुनर्प्राप्ती शक्य होते. निवडक पुनर्प्राप्तीनंतर त्या संयुगाची शुद्धता आणि गुणवत्ता तपासणे तितकेच आवश्यक असते. यासाठी आधुनिक विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची मदत घेतली जाते. जसे दूध विक्रीपूर्वी त्यातील फॅटचे प्रमाण किंवा सोन्याची शुद्धता तपासली जाते, तसेच अत्याधुनिक विश्लेषण तंत्रांच्या साहाय्याने प्रत्येक अर्काची गुणवत्ता निश्चित केली जाते. त्यामुळे उद्योगाला सातत्यपूर्ण दर्जाचे उत्पादन मिळते आणि ग्राहकांपर्यंत विश्वासार्ह आरोग्यपूरक घटक पोहोचतात. अशा प्रकारे निष्कर्षणानंतरचे शुद्धीकरण ही केवळ वैज्ञानिक प्रक्रिया नसून मूल्यवर्धनाची महत्त्वाची पायरी आहे. त्यानंतर या शुद्ध जैवसक्रिय संयुगांचे स्प्रे ड्रायिंग आणि एन्कॅप्स्युलेशनद्वारे अधिक स्थिर, सुरक्षित आणि वापरण्यास सोपी आरोग्यपूरक उत्पादने तयार केली जातात..आरोग्यपूरक उत्पादनांची निर्मितीशुद्ध जैवसक्रिय संयुगे मिळाल्यानंतर बायोरिफायनरीची पुढील पायरी म्हणजे त्यांचे बाजारपेठेसाठी उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर करणे. नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स प्रकाश, उष्णता आणि आर्द्रतेमुळे कालांतराने निष्क्रिय होऊ शकतात. त्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवणे आवश्यक असते.यासाठी स्प्रे ड्रायिंग आणि एन्कॅप्स्युलेशन या आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग केला जातो. स्प्रे ड्रायिंगद्वारे द्रवरूप अर्काचे सूक्ष्म पावडरमध्ये रूपांतर केले जाते. त्यानंतर एन्कॅप्स्युलेशन प्रक्रियेत या जैवसक्रिय घटकांभोवती सूक्ष्म संरक्षक आवरण तयार केले जाते. जशी औषधाची कॅप्सूल आतील औषधाचे संरक्षण करते, त्याचप्रमाणे हे सूक्ष्म आवरण अँटिऑक्सिडंट्सची स्थिरता वाढवते, साठवण आणि वाहतूक सुलभ करते..या प्रक्रियेनंतर तयार होणारी अँटिऑक्सिडंट पावडर न्यूट्रास्युटिकल्स, कार्यक्षम अन्नघटक तसेच नैसर्गिक अन्न संरक्षक म्हणून वापरता येते. कृत्रिम संरक्षकांना पर्याय म्हणून नैसर्गिक अन्नघटकांची मागणी वाढत आहे. अशा उत्पादनांचे औद्योगिक महत्त्वही वाढत आहे.योग्य प्रक्रिया केल्यामुळे डाळिंबाच्या सालीतील जैवसक्रिय संयुगे प्रयोगशाळेतील अर्क न राहता स्थिर, सुरक्षित आणि मूल्यवर्धित आरोग्यपूरक उत्पादनांमध्ये रूपांतरित होतात. मात्र ग्रीन बायोरिफायनरीचा प्रवास येथे संपत नाही. मौल्यवान संयुगे वेगळी काढल्यानंतर उरलेली जैवसंपत्तीही तितकीच महत्त्वाची असते. तिच्या पुनर्वापरातूनच शून्य कचरा या संकल्पनेची खरी अंमलबजावणी होते..शून्य कचऱ्याकडे वाटचालग्रीन बायोरिफायनरीची संकल्पना एका उत्पादनावर थांबत नाही. डाळिंबाच्या सालीतील प्रत्येक घटकाचा टप्प्याटप्प्याने उपयोग करून त्यातून अधिकाधिक मूल्य निर्माण करणे, हा तिचा मूलभूत सिद्धांत आहे. प्रथम उच्च मूल्याची जैवसक्रिय संयुगे मिळवली जातात. त्यानंतर उरलेल्या जैवभारातून आहारातील तंतू, पशुखाद्य, जैवखते, जैवऊर्जा किंवा इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. अशा प्रकारे एका प्रक्रियेतील अवशेष पुढील प्रक्रियेचा कच्चा माल बनतो आणि शून्य कचरा या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल होते. डाळिंबाच्या सालीचे हे उदाहरण महाराष्ट्रातील संत्री, आंबा, केळी, द्राक्षे, कांदा, टोमॅटो यांसारख्या इतर कृषी अवशेषांनाही लागू पडते. विज्ञान, उद्योग आणि शेतकरी यांची सांगड घालून या जैवसंपत्तीचे मूल्यवर्धन केले, तर शेतीतील अवशेष हा प्रश्न न राहता ग्रामीण जैवअर्थव्यवस्थेची नवी संधी ठरू शकतो..स्वाहा केंद्राचा अनुभवडाळिंबाच्या सालीवर आधारित ग्रीन बायोरिफायनरीची ही संकल्पना केवळ संशोधनापुरती मर्यादित नाही. व्हीएनआयटी, नागपूर येथील डीएसटी- मेरिनो सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये या संपूर्ण प्रक्रियेवर गेल्या काही वर्षांत सातत्याने संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातून अँटिऑक्सिडंट पुनर्प्राप्ती, ग्रीन बायोरिफायनरी प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्सची निर्मिती आणि एलॅजिक आम्लाच्या निवडक पुनर्प्राप्ती या विषयांवरील चार भारतीय पेटंट्स प्राप्त झाली आहेत. .संशोधन प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता मेरिनो इंडस्ट्रीज, हापूर येथे तीन महिन्यांहून अधिक काळ पायलट प्लांटवर या प्रक्रियेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे डाळिंबाच्या सालीपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची ही संकल्पना औद्योगिक स्तरावरही व्यवहार्य असल्याचे सिद्ध झाले आहे. डाळिंबाच्या सालीचे हे उदाहरण एका व्यापक परिवर्तनाची दिशा दाखवते. कृषी अवशेषांना कचरा न मानता त्यांच्याकडे जैव-उद्योगासाठी कच्चा माल म्हणून पाहिले, तर शेतकरी, प्रक्रिया उद्योग, संशोधन संस्था आणि उद्योजक यांच्यासाठी मूल्यनिर्मितीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. ग्रीन बायोरिफायनरी ही केवळ प्रयोगशाळेतील संकल्पना नसून, शाश्वत ग्रामीण जैवअर्थव्यवस्थेकडे नेणारा एक व्यवहार्य मार्ग आहे.- प्रफुल्ल दाढे ९०२८३ ८६७९८- आदित्य पोटोडे ९८३४९ ०२३५०(लेखक स्वाहा सेंटर ऑफ एक्सलन्स, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी),नागपूर येथे कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.