Effects of War on Global Economy and Peoples: मागील काही वर्षांपासून जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असे भारताला प्रस्तुत केले जात आहे. परंतु दुसरीकडे देशात गरिबीचे प्रमाणही अधिक असून गरीब - श्रीमंत ही दरी सातत्याने वाढते आहे. सुमारे १४५ कोटी लोकसंख्येच्या देशात ८० कोटींहून अधिक लोकांना ते केंद्र सरकारच्याच अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप केले जाते. अर्थात तेवढे लोक गरीब आहेत..देशात संपत्तीचे असमान वितरणही खूप असून ते वरचेवर वाढत आहे. देशातील केवळ एक टक्का लोकांकडे एकूण संपत्तींपैकी ४० टक्के एवढी संपत्ती तर तळातील अर्ध्या लोकांकडे (५० टक्के) केवळ तीन टक्केच संपत्ती असल्याचे अनेक अहवाल सांगतात. अधिक गंभीर बाब म्हणजे अमेरिका - इस्राईल, इराण यांच्यातील युद्धामुळे देशातील सुमारे २५ लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची भीती संयुक्त राष्ट्राकडून (यूएन) एका अहवालाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे..US Iran Conflict: दोन आठवड्यांची शस्त्रसंधी.केवळ गरिबीतच वाढ होणार नाही, तर रासायनिक खतांसह अनेक उत्पादने महागली आहेत, आयात निर्यातीच्या व्यापारालाही ब्रेक लागला आहे. आपली अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा धोक्यात येणार असून, येथील सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीवर या संघर्षाचे परिणाम होत आहेत. एकंदरीतच काय तर या आखाती युद्धाचा आपला थेट संबंध नसला, तरी याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे..खरे तर कोरोना महामारीने अन्न असो की इंधन - ऊर्जा स्वयंपूर्णतेचे महत्त्व जगाला पटवून दिले होते. यापासून धडा घेत चीनने अन्नसुरक्षेला महत्त्व दिले. इतरही अनेक देशांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आत्मनिर्भरतेच्या अनुषंगाने व्यापक धोरणात्मक बदल केले. आपण मात्र कोरोना महामारीतून काहीही शिकलो नाही, हेच आजच्या आपल्या परिस्थितीतून दिसून येते..असे म्हटले जाते, की युद्धात कोणाही जिंकत नाहीत आणि हे सत्य आहे. कारण युद्धात जय-पराजय कोणाचाही झाला तरी यात होणारी जीवितहानी, शहरे - संसाधनांचा विनाश आणि त्यातून उद्भविणारे दुःख हे कोणत्याही विजयापेक्षा मोठे असते. युद्धात कोणी जिंकत नाही, फक्त माणसे मात्र हरतात. त्यामुळे ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असा विचार मांडला जातो..US Iran Israel Conflict: १४० कोटी जनतेला अंधारात ठेवू नका; इराण-इस्रायल युद्धावर पंतप्रधान गप्प का? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल.सर्वसामान्यपणे कुठेही चालू असलेले युद्ध थांबविण्यासाठी तत्काळ काही तरी तोडगा काढण्याचे प्रयत्न होत असतात. तसे या युद्धाच्या बाबतीत दिसून येत नाही. अमेरिकेने इस्राईलच्या साथीने हे सुरू केलेले युद्ध मुळातच अविचारी आहे. त्यामुळे हे युद्ध थांबेल (तात्पुरता युद्धविराम नव्हे, तर युद्धाला पूर्णविराम) कधी याची चिंता जगाला लागलेली आहे. आपल्यासाठी सर्वांत मोठा धोका म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च वाढून उत्पादन घटू शकते..शिवाय निर्यातीला ब्रेक लागल्याने शेतीमालाच्या देशांतर्गत दरावरही दबाव येऊ शकतो. त्यामुळे मुळातच तोट्यात असलेल्या शेतीचा तोटा वाढणार आहे. अशा वेळी देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय होईल, हवामान बदलाच्या आव्हानाबरोबरच या युद्ध समस्येत शेती कशी टिकेल, हा खरोखरच चिंतेचा विषय आहे..या युद्धाच्या झळा आखाती देशांना अधिक बसणार असून तिथे आर्थिक मंदी पसरणार आहे. देशातील अनेक छोट्यामोठ्या उद्योग-व्यवसायांना याचा फटका बसेल. महत्त्वाचे म्हणजे मुळातच कमी असलेल्या भारतीयांच्या क्रयशक्तीत अजून घट झाली तर त्याचे व्यापक आर्थिक सामाजिक दुष्परिणाम होतील. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पुढील वाटचालीची दिशा राज्यकर्त्यांना ठरवावी लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.